आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 20 वा सामना मंगळवारी (6 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अबू धाबी येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. मागील दोन हंगामात दोन्ही संघांमध्ये 4 सामने खेळले गेले होते, या चारही सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. यंदाच्या 13 व्या हंगामात राजस्थानने आतापर्यंत 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत तर मुंबईने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
राजस्थानने या हंगामात शारजाह येथे खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या राजस्थान संघात काही बदल होऊ शकतात. युवा भारतीय खेळाडू यशस्वी जयस्वाल स्टार फलंदाज जॉस बटलरसोबत सलामीला येऊ शकतो. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या जागी भारतीय वेगवान गोलंदाज वरुण एरॉन किंवा युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ आहे उत्कृष्ट फॉर्ममध्ये
पहिल्याच सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने शानदार पुनरागमन केले. या संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. रोहितही उत्तम फॉर्मात आहे. हार्दिक पंड्या, ईशान किशन, कायरान पोलार्ड हे आक्रमक फलंदाज चांगलीच फटकेबाजी करत आहेत. मागील सामन्यात सलामीवीर क्विंटन डिकॉकनेही चांगली फलंदाजी केली. अशा परिस्थितीत राजस्थानला मुंबईला पराभूत करणे सोपे जाणार नाही.
मुंबईची गोलंदाजीही आहे उत्तम
मुंबईचे गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन या वेगवान गोलंदाजांना बळी मिळवण्यात यश आले आहे. त्याचवेळी राहुल चहर आणि कृणाल पंड्या या फिरकीपटूंनीही फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे.
राजस्थान संघ बटलर, सॅमसन आणि स्मिथवर आहे अवलंबून
राजस्थान संघ कर्णधार स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर आणि संजू सॅमसन या फलंदाजांवर अवलंबून आहे. राहुल तेवतिया आणि महिपाल लोमरोर यांनीही चांगली खेळी केली आहे. पण मुंबईविरुद्ध जिंकण्यासाठी या संघातील अव्वल 3 फलंदाजांना धावा कराव्या लागतील.
जोफ्रा आर्चरवर असेल अधिक जबाबदारी
राजस्थान संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर अधिक जबाबदारी असेल. अन्य गोलंदाजांनाही मुंबईच्या चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत श्रेयस गोपाल आणि टॉम करन यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. वरुण एरॉनला संधी मिळाली तर संघाची गोलंदाजी अधिक बळकट होऊ शकते.
दोन्ही संघांचे महागडे खेळाडू
कर्णधार स्मिथ राजस्थानमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याची किंमत 12.50 कोटी असून संजू सॅमसनची किंमत आठ कोटी इतकी आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. त्यानंतर हार्दिक पंड्याचा क्रमांक लागतो, त्याला प्रत्येक हंगामात 11 कोटी रुपये मिळतात.
हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती
अबूधाबीतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहिल. तापमान 28 ते 36 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असेल. खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटुंना खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देईल. येथे खेळलेल्या 44 टी20 सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांचा विजय मिळवण्याचा दर 56.81 % आहे.
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने: 44
प्रथम फलंदाजी करताना संघाला मिळालेला विजय : 19
प्रथम गोलंदाजी करताना संघाला मिळालेला विजय: 25
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 137
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 128
मुंबईने सर्वाधिक 4 वेळा जिंकला खिताब
मुंबईने आयपीएलच्या इतिहासात 4 वेळा (2019, 2017, 2015, 2013) जेतेपद जिंकले आहे. मागच्या वेळी मुंबईने अंतिम सामन्यात चेन्नईचा 1 धावाने पराभव केला होता. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा अंतिम सामना खेळला आहे. राजस्थानने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात किताब आपल्या नावावर केला होता.
मुंबईचा विजय मिळवण्याचा दर राजस्थानपेक्षा जास्त आहे
लीगमधील मुंबईचा यशाचा दर पंजाबपेक्षा जास्त आहे. आयपीएलमध्ये मुंबईने 192 सामने खेळले आहेत. यात त्याने 112 सामने जिंकले आहेत आणि 80 सामन्यात पराभव झाला आहे. म्हणजेच लीगमध्ये विजय मिळवण्याचा दर 58.07% आहे. त्याचबरोबर, लीगमध्ये राजस्थान संघाचा विजय मिळवण्याचा दर 31.34% आहे. राजस्थानने आतापर्यंत एकूण 151 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने 77 जिंकले आहेत आणि 72 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. 2 सामने अनिर्णित ठरले.