भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी काही दिवसांपूर्वीच रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली. काही वर्षांपूर्वी देखील पोवार यांनी महिला संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. पण २०१८ सालच्या टी२० विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीतून भारतीय संघ बाहेर पडल्यावर रमेश पोवार आणि वरिष्ठ खेळाडू मिताली राज यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोवार यांना प्रशिक्षक पदावरून दूर करण्यात आले.
मात्र तीन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा डब्ल्यू.व्ही.रमण यांच्या जागी पोवार यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे रमण यांची कामगिरी चांगली असतांना देखील त्यांना हटवण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केल्या गेले. मात्र कितीही वाद झाले असले तरी पुढील काही काळासाठी तरी पोवार भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी असणार हे निश्चित आहे. अशावेळी त्यांच्यासोबत काम करण्याबाबत मितालीने नुकतेच भाष्य केले.
“देशापुढे वैयक्तिक मुद्दे गौण”
रमेश पोवार यांच्यासह मतभेद असतांना कसं काम करणार, यावर उत्तर देतांना मिताली म्हणाली, “आपण भूतकाळात जाऊ शकत नाही. मी अनेक वर्षे झाली खेळते आहे आणि माझ्यात कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. २१ वर्षे हा खूप मोठा कालावधी आहे. यात मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. जेव्हा भारताकडून खेळण्याचा मुद्दा येतो, त्यावेळी तुम्ही देशाची सेवा करत आहात हे लक्षात घ्यावे लागते. त्यामुळे अशावेळी मी वैयक्तिक मुद्द्यांना फारसे महत्व देत नाही.”
मिताली म्हणाली की तिला एक कर्णधार म्हणून आणि पोवार यांना प्रशिक्षक म्हणून एकजुट होऊन काम करावे लागेल, ज्यामुळे संघाचा फायदा होईल. “पोवार प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी रणनीती आखली असेल. हे गरजेचे आहे की आम्ही दोघेही एकजुट होऊन काम करावे. त्यामुळेच संघ पुढे जाईल. कारण आमचे लक्ष्य एकच आहे, ते म्हणजे संघाने विश्वचषकात सर्वोत्तम प्रदर्शन करावे”, असे मत मितालीने यावेळी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या –
सात वर्षांपूर्वी रैनाने एकाच षटकात ७ वेळा चेंडूला केले होते सीमापार, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर
‘या’ कारणामुळे जडेजा अन्य खेळाडूंपेक्षा क्षेत्ररक्षणात आहे सरस, स्वत:च केलाय खुलासा