क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठ-मोठे विक्रम नव्याने बनत असतात आणि काही काळाने ते मोडतही असतात. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक क्रिकेटपटूंनी अफलातून कामगिरी करत मोठ-मोठ्या विक्रमांची नोंद केली आहे आणि काही काळानंतर दुसऱ्या क्रिकेटपटूंनी ते पुर्वीचे विक्रम मोडत आपल्या नावावर केले आहेत.
परंतु, भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपल्या नावावर केलेला एक विक्रम, 35 वर्षे झाली तरी आजही अबाधित आहे. अझरुद्दीन हे एकमेव क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या ३ कसोटी सामन्यात शतके ठोकण्याची हॅटट्रिक करत, क्रिकेट इतिहासात आपले नाव नेहमीसाठी कोरले.
ही गोष्ट आहे, १९८४-८५सालची. जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता, त्यावेळी दोन्ही संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. यावेळी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सुनील गावसकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला होता. तो सामना भारताने ८ विकेट्सने जिंकला होता.
त्यापुढील दुसरा कसोटी सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (तेव्हाचे फिरोजशाह कोटला स्टेडियम) झाला होता. पण, या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत ८ विकेट्सने विजय मिळवला होता. भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनामुळे कपिल देव आणि संदीप पाटील यांना पुढील सामन्यासाठी संघातून बाहेर काढून टाकण्यात आले होते. म्हणून त्यांच्या जागी चेतन शर्मा आणि अझरुद्दीन यांना संघात घेण्यात आले होते.
त्यावेळी अझरुद्दीन हे २१ वर्षांचे होते आणि तो त्यांचा कसोटी पदार्पणाचा सामना होता. यावेळी इडन गार्डन स्टेमडियमवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात अझरुद्दीन यांनी शतकी खेळी केली. त्यानंतर मालिकेतील उर्वरित २ कसोटी सामन्यात खेळतानाही अझरुद्दीन यांनी दमदार शतकी खेळी केल्या होत्या. अशाप्रकारे सलग ३ कसोटी सामन्यात खेळताना त्यांनी सलग ३ शतके ठोकत हॅटट्रिक घेतली होती.
त्यामुळे अझरुद्दीन हे पहिल्या ३ कसोटी सामन्यात शतकांची हॅटट्रिक घेणारे जगातील पहिले आणि एकमेव क्रिकेटपटू बनले. Mohammed Azharuddin world record hasn’t been broken in last 35 years.
कोलकाता, तिसरा कसोटी सामना-
कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी अझरुद्दीन हे ५व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरले होते. त्यावेळी नॉन स्ट्रायकिंग बाजूला रवि शास्त्री फलंदाजी करत होते. अझरुद्दीन यांनी या सामन्यात १० चौकारांसह ११० धावा केल्या होत्या. पण, खराब वातावरणामुळे सामना अनिर्णित राहिला होता.
चेन्नई, चौथा कसोटी सामना-
चेन्नईतील एम चिंदबरम स्टेडियमवर मालिकेतील चौथा आणि अझरुद्दीन यांचा दुसरा कसोटी सामना खेळण्यात आला होता. तेव्हापर्यंत ती मालिका १-१च्या बरोबरीवर होती. या सामन्यातही नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात अझरुद्दीन फक्त ४८ धावांवर बाद झाले होते.
पण, दुसऱ्या डावात ५व्या क्रमांकावर फलंदाजी करत अझरुद्दीन यांनी १८ चौकांरासह १०५ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने एका विकेटने गमावला होता. पण, अझरुद्दीन यांचे नाव सगळ्या भारतीय चाहत्यांच्या तोंडून गाजत होते.
कानपुर, पाचवा कसोटी सामना-
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना कानपुर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळण्यात आला होता. यावेळी पहिल्या डावातच भारताने ५५३ धावा केल्या होत्या. यात अझरुद्दीन यांच्या शतकाचा समावेश होता. त्यांनी १६ चौकार मारत १२२ धावा केल्या होत्या. पण हा सामना अनिर्णित राहिला होता.
अशाप्रकारे अझरुद्दीन यांनी त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३ शतकांसह ४३९ धावा केल्या होत्या. पुढे त्यांच्या शानदार प्रदर्शनामुळे ते पुढे भारतीय संघाचे यशस्वी कर्णधारही बनले.
ट्रेंडिंग घडामोडी-
कोहलीला सतत तंबूचा रस्ता दाखवणारे जगातील ५ गोलंदाज
हाॅटेलमध्ये नशा करताना पकडले होते हर्षल गिब्जला, मिळाली होती ही मोठी…
माझ्यावरील बॅनचा स्विकार करतो, परंतु सट्टेबाजांची नावं सांगणार नाही