मुंबई । अनेकदा खेळाडू क्रिकेटच्या क्षेत्रात काही वादग्रस्त वर्तवणूक करतात. पण हे वाद मैदानाबाहेरही पाहायला मिळतात. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडू खूप पुढे आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू सार्वजनिक व्यासपीठावर अशी अनेक वादग्रस्त विधाने करत असतात. ज्यामुळे त्यांची आणि पाकिस्तानची केवळ खिल्ली उडते. मागील विश्वचषकामध्ये असेच काही घडले होते जेव्हा माजी यष्टीरक्षक मोईन खानने एका खासगी वाहिनीवर अतिशय वादग्रस्त विधान केले होते.
मोईन खानने 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघावर वादग्रस्त विधान केले होते. विश्वचषकात भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला विश्रांती दिली होती. त्यानंतर मोईन खानने भारतीय संघावर अतिशय गंभीर आरोप लावले. श्रीलंकेविरूद्ध भेदभावामुळे मोहम्मद शमीला खेळण्यास संधी दिली नाही, असा आरोप मोईन खान यांनी केला. मोईन खान म्हणाले की, ‘विश्वचषकात मोहम्मद शमीने 15 विकेट घेतल्या आहेत, पण मुस्लिम असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले.’
मोईन खान पुढे असेही म्हणाला की, ‘भाजपाच्या दबावाखाली मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढले गेले. श्रीलंकेविरूद्ध भारताने दोन बदल केले होते. शमीऐवजी जडेजा आणि युजवेंद्र चहल यांच्या जागी कुलदीप यादव संधी देण्यात आली.”
विश्वचषक 2019 दरम्यान पाकिस्तानच्या इतर माजी खेळाडूंनीही भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. पाकिस्तानला विश्वचषकामधून बाहेर काढण्यासाठी भारतीय संघ जाणीवपूर्वक आपले सामने गमावू शकतो असा दावाही बासित अली यांनी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय क्रिकेटर म्हणजे तर साक्षात रिकी पॉटींगच
–खुशखबर! क्रिकेटमधील धमाल लीग असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर
–कोरोनामुळे ४ महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये अडकलेला क्रिकेटर अखेर वेस्ट इंडिजला रवाना