भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीय संघाने कर्णधार अजिंक्यची विकेट गमावल्यानंतर पराभवाची लक्षणे दिसत होती. मात्र त्यानंतर संपूर्ण संघाने आपले कौशल्य पणाला लावत सामना अनिर्णित राखला. भारताच्या या कामगिरीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे.
भारताने चौथ्या डावात तब्बल 131 षटके फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील अनिर्णित सामन्यांमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक षटके फलंदाजी करण्याच्या बाबतीत सिडनी कसोटीतील भारताच्या डावाचा संयुक्तपणे चौथा क्रमांक येतो.
या पूर्वी भारताने 1979 आली इंग्लंड विरुद्ध चौथ्या डावात तब्बल 150.5 षटके खेळली होती. त्यानंतर 1948 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 136 षटके, 1958 साली वेस्ट इंडिज विरुद्धच 132 षटके भारताने चौथ्या डावात खेळली होती. 1979 साली पाकिस्तान विरुद्ध सिडनी कसोटी प्रमाणेच 131 षटके फलंदाजी केली होती.
सिडनी येथे पार पडलेल्या सामन्यात भारताने चौथ्या डावात 131 षटकात 5 गडी गमावत 334 धावा केल्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी व रविचंद्रन अश्विन या सर्वांनीच उत्तम फलंदाजी केली. सर्वच खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या बळावरच भारताला हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले आहे. मालिकेतील चौथा व शेवटचा सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार असून, आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाकडून सर्व क्रिकेटप्रेमींना विजयाची आशा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सिडनी कसोटीतील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण, पाहा व्हिडिओ
पेनच्या बडबडीला अश्विनचे सडेतोड उत्तर! चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया
“हा निकाल पचवणे अवघड”, सिडनी कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया