पुणे। आजपासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे सुरु झाला आहे. या सामन्यात आज पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक केले आहे.
त्याने पहिल्या दिवसाखेर 105 चेंडूत नाबाद 63 धावांची खेळी केली आहे. याबरोबरच त्याने कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 600 कसोटी धावा पूर्ण करण्याचाही मोठा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 600 कसोटी धावा पूर्ण करणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
त्याने याआधी सचिनने कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या 553 कसोटी धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विराटच्या आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून 9 सामन्यात 46.15च्या सरासरीने 600 धावा झाल्या आहेत.
विशेष म्हणजे विराटचा आजपासून सुरु झालेला सामना कर्णधार म्हणून 50 वा कसोटी सामना ठरला आहे. त्यामुळे तो 50 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा भारताचा एमएस धोनीनंतरचा केवळ दुसराच कर्णधार आहे.
आजपासून पुण्यात सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 3 बाद 273 धावा केल्या आहेत. भारताकडून विराटबरोबरच मयंक अगरवालने 108 धावांची शतकी खेळी तर चेतेश्वर पुजाराने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार –
600 धावा – विराट कोहली (9 सामने)
553 धावा – सचिन तेंडूलकर (8 सामने)
461 धावा – एमएस धोनी (8 सामने)
187 धावा – सौरव गांगुली (4 सामने)
125 धावा – राहुल द्रविड (3 सामने)
120 धावा – मोहम्मद अझरुद्दीन (4 सामने)
8 धावा – अनिल कुंबळे (2 सामने)