आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा 44 धावांनी पराभव केला. दिल्लीने केलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकांत अवघ्या 131 धावा करता आल्या.
पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी खेळाडूंच्या कामगिरीमुळे निराश होता. पुढच्या सामन्यात नवीन योजनेसह मैदानात उतरू असे त्याने सांगितले.
चुका शोधण्याची आहे संधी
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला, “दुसर्या डावात मैदानात दव पडले नाही आणि खेळपट्टीही संथ होती. याशिवाय फलंदाजी विभागात कोणीही चांगली कामगिरी केली नाही. आम्हाला यावर तोडगा काढावा लागेल. आता पुढील 7 दिवस चेन्नईचा कोणताही सामना नाही त्यामुळे आम्हाला आमच्या चुका शोधण्याची उत्तम संधी आहे.”
गोलंदाजीबद्दल व्यक्त केली नाराजी
गोलंदाजीबद्दल बोलताना धोनी म्हणाला, ”गोलंदाजदेखील सातत्यपूर्ण गोलंदाजी करू शकले नाही. आम्ही संघात अतिरिक्त फलंदाजाला संधी देत आहोत. जोपर्यंत फलंदाज चांगली कामगिरी करत नाही तोपर्यंत आम्ही अतिरिक्त गोलंदाजाला संघात संधी देऊ शकत नाही. रायडूला पुढचा सामना खेळावा लागेल. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आम्ही संघात अतिरिक्त गोलंदाज खेळवू शकू.”
दिव्यांची दिशा आहे चुकीची
दुबईत झालेल्या सामन्यात खेळाडूंनी काही झेल सोडले, यावर बोलताना धोनी म्हणाला, “इथे कमी प्रकाश आहे असे नाही. परंतु दिव्यांची दिशा चुकीची आहे. त्यामुळे झेल घ्यायला त्रास होतो.”
चेन्नईला आता पुढील सामना 2 ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळायचा आहे. धोनी आपल्या संघात काय बदल करतो हे पाहावे लागेल.