मागील भागात आपण १९४७ पर्यंतच्या मुंबई क्रिकेटची माहिती घेतली. पण पुढे जाण्याआधी मुंबईच्या प्रसिद्ध ‘पंचरंगी’ स्पर्धेबद्दल थोडं सांगावसं वाटतं. याच कारण म्हणजे या स्पर्धेने मुंबईच्या जडणघडणीत भूषवलेले प्रमुख स्थान. पुढील वर्षांमध्ये या शहराने देशात जो काही दबदबा राखला त्याचं कारण म्हणजे ही स्पर्धा. धार्मिक तत्त्वावर विभागलेली ही स्पर्धा शहरात धार्मिक दंगे असताना सुद्धा सुरळीतपणे पार पडायची हे विशेष.
या स्पर्धेची खऱ्या अर्थाने सुरुवात १८८४मध्ये युरोपिअन आणि पारसी संघाच्या सामन्यांपासून झाली. १९०७साली हिंदू संघ तर १९१२साली इस्लाम जिमखान्याच्या समावेशाने ह्या स्पर्धा चौरंगी स्पर्धा झाल्या. १९३७ला ‘इतर’ संघ या स्पर्धेत उतरला आणि १९४६पर्यंत अशी पंचरंगी मालिका चालू राहिली. या स्पर्धेतील काही संस्मरणीय कामगिरी आणि किस्से आपण पाहू
१९१६ चौरंगी स्पर्धा – युरोपिअन अन्यायाविरुद्ध आवाज
हिंदू विरुद्ध युरोपिअन सामन्यात दोन्ही पंचांमधील एक युरोपिअन होता तर एक होता हिंदू संघाचा मागील वर्षीचा कर्णधार मुकुंदराव पै. इंग्लिश संघाचा खंदा फलंदाज जे.जि.ग्रेग याच्या यष्टिचित निर्णयावरून दोन्ही पंचांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अंतिम विजय अर्थात सत्ताधारी इंग्लिशजनांचाच झाला. मात्र या घटनेवरून पुढील वर्षांपासून निष्पक्ष पंच नेमले जाऊ लागले. हे तोपर्यंत क्रिकेटमध्ये कधीच झाले नव्हते.
१९२० – कांगांची जिगरी खेळी
१९२०सालचा अंतिम सामना खेळला गेला तो हिंदू विरुद्ध पारसी असा होता. सी के नायुडूंच्या शतकाच्या जोरावर हिंदू संघाने प्रथम फलंदाजी करत ४२८ धावांचा डोंगर रचला. उत्तरात पारसी संघ २१४ धावांवर आटोपला आणि फॉलो-ऑनची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. अशात संघाचे कर्णधार एच.डी. कांगा जायबंदी होऊन हॉस्पिटलात दाखल होते.
अखेरच्या दिवशी पारसी संघाच्या नऊ बळी घेतल्यानंतर हिंदू संघाने विजय साजरा करण्यास सुरुवात केली मात्र त्याच वेळी पॅव्हिलिअन मधून फलंदाजी साठी सज्ज झाले ते एच.डी. कांगा. जायबंदी अवस्थेत त्यांनी उरलेला अक्खा दिवस बॅटिंग केली आणि अखेरीस ट्रॉफी हिंदू आणि पारसी संघात विभागली गेली.
१९२३ – हिंदूंचा चमत्कारिक विजय
अंतिम सामन्यात युरोपिअन संघाची गाठ पडली हिंदू संघाशी. पहिली फलंदाजी करत त्यांनी ४९१ धावांची टोलेजंग इमारत उभारली. हिंदूंनी उत्तरादाखल विठ्ठल पळवणकरच्या शतकी खेळीच्या जोरावर ४७५ धावा केल्या. चार दिवसाच्या सामन्यातील तीन दिवस पूर्ण झालेले आणि निकालाच्या आशा मावळतीस होत्या.
अखेरच्या दिवशी मात्र एस.एम.जोशी नावाच्या गोलंदाजाने ३९/७ बळी घेत युरोपिअन संघाचा १५३ धावात खुर्दा उडवला. हिंदूंपुढे दोन तासात १६२ धावांचे महाकठीण लक्ष्य होते. अशावेळी कर्णधाराने सलामीला पाठवले सी.के.नायूडूंना. गोलंदाजीचा धुरळा उडवीत त्या महान फलंदाजाने हिंदूंना जेतेपद मिळवून दिले.
१९४३ – मर्चंट-हजारेंची शर्यत आणि हजारेंची महान खेळी
भारताच्या दोन महान फलंदाजांमध्ये शर्यत लागली ती एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पटकावण्याची. १९४२ला विजय मर्चंट २४३*, १९४३च्या उपांत्य फेरीत विजय हजारे २४८, लगेच अंतिम सामन्यात पुन्हा मर्चंट २५०* असा खेळ सुरु राहिला. याच अंतिम सामन्यात मात्र हजारेंनी केवळ अविश्वसनीय अशी खेळी करत हा विक्रम स्वतःकडे हिसकावून घेतला.
हिंदूंच्या पहिल्या डावातील ५८१/५ धावांचे उत्तर देताना इतर संघ पहिल्या डावात १३३वर गडगडला. दुसऱ्या डावात त्यांची स्थिती ६२/५ अशी असताना हजारेंच्या साथीला आला त्यांचा धाकटा भाऊ विवेक हजारे. तो एकीकडे डाव सांभाळून खेळत असताना विजय हजारेंनी त्रिशतकी डोंगर उभारला. जेव्हा अखेरीस संघ ३८७वर सर्वबाद झाला तेव्हा त्यातील हजारेंचा वाटा होता ३०९चा! हि त्रिशतकी खेळी भारतीय इतिहासाच्या सर्वोत्तम खेळीतली एक मानली जाते.
१९४४ – नायूडूंचा सल्ला आणि मुश्ताक अलींचा पराक्रम
१९४४च्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले हिंदू आणि मुस्लिम संघ. अमीर इलाहीच्या ५ बळींच्या जोरावर हिंदू संघ केवळ २०३ धावा करू शकला. मुस्लिम संघाने १८ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात हिंदू संघाने ३१५ धावा करत २९८ धावांचे लक्ष्य ठेवले.
एकीकडून के.सी.इब्राहिम मुक्तपणे धावा करत असताना दुसऱ्या बाजूने त्याला कोणाची साथ मिळाली नाही. दुखापतीमुळे डॉक्टरांनी मुश्ताक अलींना खेळण्यापासून मनाई केली होती. अशा वेळी सामना पाहत असलेले सी के नायुडू त्यांना बोलले ‘तू इथे काय करतोयेस, तुझी जागा तिकडे मैदानावर आहे’. त्या दुखऱ्या अवस्थेत मुश्ताक अलींनी जलदगती ३६ धावा केल्या आणि संघाला सामना जिंकवून दिला.
१९४६ला भारताची धर्माच्या आधारावर फाळणी होणार हे निश्चित झाले आणि ही स्पर्धा बंद करण्यात आली. मुंबईकरांसाठी ही स्पर्धा म्हणजे पर्वणी होती. अगदी महात्मा गांधींचा विरोध पत्करून ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. अखेरीस पुलंच्याच शब्दात सांगायचं तर “हर हर त्या क्वाड्रान्ग्यूलर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला”.
आतापर्यंतच्या लेखांचा प्रमुख स्रोत –
‘अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फिल्ड’ – रामचंद्र गुहा
‘क्रिकेट मेमोईर्स’ – वसंत राईजी
वाचा-
मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट