जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतही कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला आहे. गेल्या वर्षापासून भारत कोरोनाच्या या संकटाचा सामना करत असून आता तर दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला आहे. त्यामुळे सध्या सर्वजणच सुरक्षित राहा, आरोग्याची काळजी घ्या, असे संदेश वेगवेगळ्या स्वरुपात देत आहे. नुकतेच इंडियन प्रीमीयर लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनेही हटके पद्धतीने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी स्वच्छता राखण्याचा सामाजिक संदेश दिला आहे.
खरंतर या कोरोना व्हायरसच्या संकटाचा फटका आयपीएलच्या १४ व्या हंगामालाही बसला आहे. हा हंगाम २९ सामन्यांनंतर संघांच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा अचानक प्रादुर्भाव वाढल्याने ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतर ६ मे रोजी मुंबई इंडियन्सने सानिटायझरच्या बॉटलचा वापर करुन सामाजिक संदेश देणारे एक खास ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये एक मोठी सानिटायझरची बॉटल दिसते, ज्यावर ‘घरी राहा’, असे लिहिले आहे. तसेच या बॉटलच्या आत एका सोफ्यावर एक व्यक्ती बसला असून मोबाईल पाहात आहे. तसेच तिथे एक छोटे रोपटे देखील आहे.
या फोटोला मुंबई इंडियन्सने कॅप्शन दिले आहे की ‘घरी राहा, हात धूवत राहा आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळत राहा.’
https://twitter.com/mipaltan/status/1390329283470532609
खरंतर भारतात सध्या रोज लाखोंमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यातच वैद्यकिय सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सध्या जगभरातून भारतासाठी प्रार्थना केली जात आहे.
तसेच अनेक क्रिकेटपटूही यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, हार्दिक आणि कृणाल पंड्या, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन असे काही भारतीय खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. याशिवाय आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई इंडियन्सची आयपीएलमधील कामगिरी
मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधी सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आत्तापर्यंत २०१३,२०१५,२०१७,२०१९ आणि २०२० असे एकूण ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच मुंबईने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळले असून सर्वाधिक सामने जिंकलेही आहेत. त्यांनी २१० सामने आयपीएलमध्ये खेळले असून १२२ सामने जिंकले आहेत.
तसेच २०२१ हंगामातही मुंबईची कामगिरी चांगली होती. त्यांनी आयपीएलचा हा खेळलेल्या ७ सामन्यांत ४ सामने जिंकले होते. तर ३ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हा हंगाम स्थगित होण्यापूर्वी गुणतालिकेत ते ८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
संघसहकारी असावा तर असा! केवळ जैयस्वाललाच नाही तर अनुज रावतलाही बटलरकडून मिळाली खास भेट, पाहा व्हिडिओ
भारताबाहेर होणार आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन? इंग्लंडनंतर आता ‘या’ देशानेही दिली ऑफर






