भारतीय संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा करून भारतात परतला आहे. वरिष्ठ व अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थित भारताच्या युवा संघाने कसलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवत इतिहास घडविला. या कामगिरीत तमिळनाडूचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याचे महत्त्वाचे योगदान राहिले. नटराजन आपल्या घरी परतल्यानंतर त्याचे अत्यंत जोशपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले होते. नटराजनने ट्वीट करत या स्वागतासाठी हजर असणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत.
नटराजनने गाजवला ऑस्ट्रेलिया दौरा
युएई येथे झालेल्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी चांगली कामगिरी केल्याचे बक्षीस म्हणून नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, इतर खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. नटराजनने या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. या संपूर्ण दौर्यात प्रभावी कामगिरी करत त्याने कौतुक मिळवले होते.
गावी झाले होते शानदार स्वागत
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर प्रथमच आपल्या गावी आलेल्या नटराजनचे २१ जानेवारी रोजी आगमन झाले होते. तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील चिनप्पमपट्टी या नटराजनच्या गावी हजारो चाहत्यांनी हजेरी लावत आपल्या आवडता खेळाडूचे जंगी स्वागत केले होते. त्यानंतर आज (२ फेब्रुवारी) नटराजनने आपल्या ट्विटर हँडलवरून सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्या मिरवणुकीतील काही छायाचित्रे शेअर करताना नटराजनने लिहिले, ‘चिनप्पमपट्टी या माझ्या गावी अशा प्रकारचे चकित करणारे स्वागत पाहून मी अत्यंत आनंदित व उत्साहित झालो होतो. या प्रेमासाठी व पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद’
ऐतिहासिक विजयाचा भाग राहिला नटराजन
भारताने ऑस्ट्रेलिया जिंकलेल्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना जिंकून देण्यात नटराजनने मोलाचा वाटा उचलला होता. ब्रिस्बेन येथे झालेल्या या कसोटीत पदार्पण करताना नटराजनने तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवले होते. त्याआधी, टी२० मालिकेतही तो सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज होता. अष्टपैलू हार्दिक पांड्याने नटराजनच्या कामगिरीचे कौतुक म्हणून आपल्याला मिळालेला मालिकावीर पुरस्कार त्याला दिला होता.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालविरुद्ध अखेर बेंगळुरूला विजय
विजय हजारे ट्रॉफीत नवा खेळाडू करणार कर्नाटकचे नेतृत्व, असा आहे संघ