भारतीय संघाने (team india) बुधवारी (०२ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियावर मात करून १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना गाठला. भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूल (yash dhull) याने या उपांत्य सामन्यात स्वतःचे शतक पूर्ण केले. यशच्या कमाल खेळीच्या जोरावर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली आणि शेवटी ९६ धावांनी विजय मिळवला. यशने ज्याक्षणी शतक पूर्ण केले, त्यावेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील प्रत्येक खेळाडू आनंदी दिसत होता. सोबतच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख वीवीएस लक्ष्मण (vvs lakshman) देखील आनंदी होते.
१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धातील यश धूलने केलेले हे पहिलेच शतक ठरले आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या या उपांत्य सामन्यात यशने सावध खेळी करत ११० चेंडूत ११० धावा केल्या. यापूर्वी त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ८२ धावांची खेळी केली होती, पण त्यावेळी त्याचे शतक हुकले होते. अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर यश कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. कोरोनावर मात करून यशने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केले, पण यामध्ये तो अपेक्षित खेळी करू शकला नव्हता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात यशचे योगदान बहुमूल्य ठरले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियातील हा उपांत्य सामना एंटिगुआ स्थित कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. यशने या सामन्यात केलेल्या ११० धावांमध्ये त्याच्या १० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यशचे शतक पूर्ण होताच ड्रेसिंग रूममध्ये बसलेले त्याचे सर्व सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आनंद साजरा करू लागले. एनसीए प्रमुख वीवीएस लक्ष्मणही सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडीजमध्ये आहेत. यशची शतकी खेळी पाहून लक्ष्मणही टाळ्या वाजवताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर यशच्या खेळीचा अभिमान स्पष्टपणे दिसत होता. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CZe137LPYOp/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे दोन्ही सलामीवीर अवघ्या ३७ धावांवर तंबूत परतले. परंतु त्यानंतर कर्णधार यश धूल आणि शेख राशीद (९४) यांनी संघाचा डाव सांभाळला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर २९० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ ४१.५ षटकात १९४ धावा करून सर्वबाद झाला. आता अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने सामने आहेत. १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना ५ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
शतकवीर यश धूलच्या खेळीवर वडिल म्हणाले, ‘कष्टाचं चीज होताना दिसतंय’; फायनलसाठी मोलाचा सल्लाही दिला
इंग्लंड क्रिकेटमध्ये वादळ! ऍशेस मालिकेतील पराभवानंतर ‘या’ सदस्याने दिला राजीनामा