अबू धाबीच्या मैदानावर बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने अफगानिस्तान संघाला ६६ धावांनी पराभूत करत जोरदार विजय मिळवला. भारतीय संघासाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी अप्रतिम फलंदाजी करत शतकी खेळी केली, ज्यामुळे भारतीय संघाला २०० धावांचा पल्ला गाठण्यात यश आले. रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर त्याची ‘सामनावीर’ म्हणून निवड देखील करण्यात आली होती. दरम्यान या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने भारतीय संघाच्या रणनितीबाबत खुलासा केला आहे.
सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने म्हटले की, “आम्ही आधीच विचार केला होता की, आम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. आम्हाला चांगली सुरुवात करून द्यायची होती, जे पहिल्या २ सामन्यात झाले नव्हते. राहुलची फलंदाजी आणि भागीदारी निर्णायक ठरली. आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार होतो. तसेच फलंदाजीसाठी देखील ही खेळपट्टी चांगली होती. आमच्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकून नेट रन रेट वाढवणे अतिशय महत्वाचे होते. आम्हाला आनंद आहे की, आम्ही या सामन्यात विजय मिळवला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला खेळपट्टीवर जायला आवडतं. त्यामुळे मी नेहमीच चांगले क्रिकेट शॉट खेळून मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असतो. आम्ही सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही याचा अर्थ असा मुळीच नाही की, आम्ही वाईट खेळाडू आहोत, आमचा संघ वाईट आहे किंवा संघ चालवणारी व्यक्ती वाईट आहे. आम्ही गेल्या काही कालावधीपासून तीनही स्वरूपात सतत क्रिकेट खेळतोय.”
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २ बाद २१० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तान संघाला ७ बाद १४४ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
एका विजयाने बदलली समीकरणे, जाणून घ्या टीम इंडिया कसे मिळवू शकते सेमीफायनलचे तिकीट?
‘द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची खेळाडूंना नव्हती कल्पना’, रोहितचा खुलासा