---Advertisement---

“टी20 संघात विराट-रोहितची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, कपिल देव असं का म्हणाले?

On: बुधवार, जुलै 17, 2024 7:32 PM
---Advertisement---

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असं महान भारतीय कर्णधार कपिल देव यांनी म्हटलं आहे. ते असं का बोलले, यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशा स्थितीत संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता त्यांची जागा कोण घेणार, हा मोठा प्रश्न निवडकर्त्यांसमोर आहे. परंतु कपिल देव यांच्या मते, या दोन महान खेळाडूंची जागा कोणीही घेऊ शकत नाही, कारण जो येईल तो स्वतःची ओळख बनवेल.

कपिल देव म्हणाले, “टी20 क्रिकेटमध्ये कोणीही विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा घेऊ शकत नाही. कोणताही खेळाडू कोणाचीही जागा घेऊ शकत नाही, प्रत्येकजण स्वतःची जागा बनवतो. तुम्ही पाहिल्यास, कोणीही सचिन तेंडुलकरची जागा घेऊ शकलं नाही. कोणी महेंद्रसिंह धोनीची जागा घेऊ शकला आहे का? नाही ना. जो पण खेळाडू येईल तो स्वत:ची जागा बनवेल. आशा करूया की तो त्यांच्यापेक्षा चांगला असावा.”

विराट आणि रोहितच्या जागी टी20 संघात कोणाची निवड करावी, असं विचारले असता कपिल देव म्हणाले, “माझे काम फक्त क्रिकेट पाहणं आहे. कोणाची निवड करायची हे निवडकर्त्यांचं काम आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या.”

गुरुवारी, 18 जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडला जाऊ शकतो. तसेच नवीन कर्णधाराचीही घोषणा केली जाऊ शकते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांच्या जागी कोणाची निवड होईल, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सूर्या-हार्दिकपेक्षा चांगला कर्णधार बनू शकतो श्रेयस अय्यर, ही आहेत 3 मोठी कारणं
निवृत्तीनंतर जेम्स अँडरसनला मिळाली मोठी जबाबदारी, इंग्लंडसाठी या भूमिकेत दिसणार
अमित मिश्राच नाही तर या क्रिकेटपटूंनीही केली आहे वयात गडबड, एकानं यावर्षीच जिंकला आयपीएल खिताब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---