महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यातील पराभावानंतर भारतीय महिला संघाच्या खेळाडूंची निराशा लपून राहीली नाही.
भारताची जलदगती गोलंदाज झूलन गोस्वामीलाही या पराभावाचे दु:ख झाले. पण तरी तिने भारतीय महिला संघाची पाठ थोपटली आहे.
ती या टी२० विश्वचषकाबद्दल पीटीआयशी बोलताना म्हणाली, “हे खूप निराशाजनक आहे. परंतु हे विसरू नका की त्यांनी या विश्वचषकामध्ये आपल्याला अभिमान वाटावा असा खेळ केलेला आहे. पण पोस्टमार्टम करण्याची ही वेळ नाही. ते आधीच खूप निराश असतील आणि भारतीय म्हणून आम्हाला आता त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मला संघातील प्रत्येक खेळाडूसाठी खूप अभिमान वाटतो.”
पुढे ती असंही म्हणाली की “त्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली. लक्षात ठेवा त्यांनी गट साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्याशिवाय आपण हे लक्षात घ्यायला हवं की विश्वचषकामध्ये सरासरी वयाच्या बाबतीत भारताचा सर्वात तरुण संघ होता. 16 ते 19 दरम्यान वयाच्या तीन खेळाडू (19 वर्षाची जेमिमह रॉड्रिग्स, 16 वर्षाची शाफाली वर्मा आणि रिचा घोष) संघात होत्या. ते खेळाडू बर्याच गोष्टी शिकतील आणि त्या भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे.”






