रांची। आज(22 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने महत्त्वाची भुमिका निभावली आहे.
रोहितने रविवारी (19 ऑक्टोबर) या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात द्विशतक केले. त्याने या सामन्यात 212 धावांची खेळी केली. ही खेळी केल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर रोहित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.
यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले आहे की त्याने जर चांगली कामगिरी केली नसती तर पत्रकारांनी त्याच्याबद्दल चांगले काही लिहीले नसते. पण आता या द्विशतकानंतर त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी लिहिल्या जातील. हे उत्तर देतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी मालिकेतून कसोटी सलामीवीर म्हणून सुरुवात केलेला रोहित म्हणाला, ‘सलामीला फलंदाजी करण्याची चांगली संधी होती. मला या संधीचा पूर्ण फायदा घ्यायचा होता. नाहीतर मला माहित आहे खूप काही झाले असते. तूम्ही माझ्याबद्दल खूप काही लिहीले असते. पण आता तूम्ही माझ्याबदद्ल चांगल्या गोष्टी लिहाल.’
Another classic from yet another Rohit Sharma press conference ???????? #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/XzZV9EpkxA
— BCCI (@BCCI) October 20, 2019
तसेच तो म्हणाला, ‘डावाची सुरूवात करणे माझ्यासाठी चांगली संधी होती. मी याआधीही विशाखापट्टणमला झालेल्या सामन्यादरम्यान म्हणालो होतो सलामीला फलंदाजी करण्याबद्दल माझ्यात आणि संघव्यवस्थापनामध्ये बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती.’
त्याचबरोबर त्याच्या खेळीबदद्ल बोलताना रोहित म्हणाला, ‘माझ्या खेळीबद्दल सांगायचे झाले तर मी म्हणेल ही सर्वात आव्हानात्मक होती. मी खूप कसोटी खेळलेलो नाही. मी केवळ 30 कसोटी खेळलो आहे. त्यामुळे मी हे नक्की सांगू शकतो की ही कदाचीत माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक खेळी होती.’
तसेच रोहित असेही म्हणाला की, ‘डावाची सुरूवात करणे हे सहाव्या – सातव्या क्रमांकावर फलंदाजीच्या तुलनेत वेगळे आव्हान आहे.’






