वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी दिनेश कार्तिक यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने १९१ धावांचे तगडे आव्हान यजमान संघाला दिले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यापुढे वेस्ट इंडीज संघाचा निभाव लागला नाही. परिणामी, भारतीय संघाने ६८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याच सामन्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा अत्यंत मजेदाररित्या धावबाद होण्यापासून बचावला.
अशी घडली घटना
भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम सुरुवात करून दिली होती. मात्र, मधल्या फळीने काहीशी कच खाल्ली. शेवटी नव्याने फिनिशरची भूमिका बजावत असलेला अनुभवी दिनेश कार्तिक व रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या गड्यासाठी ५२ धावांची नाबाद भागीदारी करत भारतीय संघाला मोठी मजल मारून दिली.
https://twitter.com/FanCode/status/1553050794051895299?t=5JKWKSMMSCSZFo4Drt8naA&s=19
भारतीय डावातील अठरावे षटक डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मेकॉय हा टाकत होता. षटकातील तिसरा चेंडू दिनेश कार्तिकने समोर मारत दोन धावांसाठी प्रयत्न केला. पहिली धाव आरामात पूर्ण झाली. मात्र दुसऱ्या धावेसाठी अश्विनला डाईव्ह मारत ती धाव पूर्ण करावी लागली. यानंतर या धावांचा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा स्पष्टपणे दिसले की, क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू मेकॉयने हातात धरून न ठेवता स्टंप्सवर लावला असता तर, अश्विन सहजरीत्या धावबाद होऊ शकला असता. मेकॉयने अश्विनला हे जीवदान ज्यावेळी दिले तेव्हा तो केवळ ४ धावांवर खेळत होता. पुढे जाऊन त्याने कार्तिक सोबत आणखी ४० धावा भारताच्या खात्यात जोडल्या.
अश्विनने फलंदाजीतील योगदानासह गोलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या चार षटकात २२ धावा देऊन दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अश्विन बऱ्याच कालावधीनंतर भारताच्या टी२० संघात पुनरागमन करत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी करणार ‘ही’ खास तयारी! खुद्द विंडीजच्या कर्णधारानेच सांगितलंय
‘मेयर्सची विकेट, अर्शदीपचं सेलिब्रेशन अन् आयपीएल कनेक्शन!’ भारताच्या माजी दिग्गजाचे स्पष्टीकरण






