---Advertisement---

जेव्हा ‘बॉल आउट’द्वारे भारताने पाकिस्तानला दिला होता धोबीपछाड, 3-0ने जिंकला होता सामना

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 3:06 PM
Bowl-Out-Video
---Advertisement---

एमएस धोनी याला क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याने भारतीय संघाला टी20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. कर्णधार म्हणून धोनीच्या प्रवासातील एक महत्वाचा आणि अविस्मरणीय दिवस म्हणून आजच्या दिवसाची (14 सप्टेंबर) आठवण काढली जाते. आजच्याच दिवशी 2007 टी20 विश्वचषकात धोनीने भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला होता. बॉल आउटद्वारे या सामन्याचा निकाल लागला होता. 

14 सप्टेंबर 2007 ला डर्बन येथे टी20 विश्वचषकातील दहावा साखळी फेरी सामना झाला होता. दोन कट्टर प्रतिद्वंद्वी संघ आमने सामने असल्याने या सामन्यावर संपूर्ण क्रिकेटविश्वाची नजर होती. मात्र हा सामना बरोबरीत सुटला होता. ज्यानंतर बॉल आउटद्वारे या सामन्याचा निकाल लावला गेला होता, ज्यामध्ये भारतीय संघ यशस्वी ठरला होता. रॉबिन उथप्पा, विरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांचा या विजयात मोलाचा वाटा राहिला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 9 बाद 141 धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून रॉबिन उथप्पाने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 39 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने त्याने 50 धावा केल्या होत्या. तसेच कर्णधार धोनीने 31 चेंडूत 1 षटकार व 3 चौकारांच्या मदतीने 33 धावा फटकावल्या होत्या. इरफान पठाणनेही 20 धावांचे योगदान दिले होते.

प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून मिस्बाह उल हकने अर्धशतक झळकावले होते. 35 चेंडू खेळताना 1 षटकार व 7 चौकार मारत हकने ही खेळी केली होती. परंतु पाकिस्तानचा संघ 20 षटकात 7 बाद 141 धावांपर्यंतच पोहोचू शकला होता आणि सामन्यात बरोबरी झाली होती. त्यावेळी सुपर ओव्हर अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल बॉल आउट नियमाने लावला गेला होता.

बॉल आउटमधील पहिल्या फेरीत भारताकडून विरेंद्र सेहवागने गोलंदाजी करताना अचूक चेंडू टाकत त्रिफळा उडवला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून यासिर अरफात चेंडू टाकायला आला होता. परंतु त्याचा चेंडू यष्टीला लागू शकला नाही. मग दुसऱ्या फेरीत भारताकडून फिरकीपटू हरभजन सिंग आला होता. हरभजननेही अचूक चेंडू टाकत यष्ट्या उडवल्या होत्या आणि चेंडू यष्टीरक्षक धोनीच्या हातात गेला होता. याच फेरीत पाकिस्तानकडून उमर गुल यांना अपयश आले होते.

तिसऱ्या व शेवटच्या फेरीत रॉबिन उथप्पाला गोलंदाजीची जबाबदारी मिळाली होती. त्यानेही यष्ट्या उडवत संघाचा विजय निश्चित केला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून शाहिद आफ्रिदीने चेंडू फेकला होता, जो मिस झाला होता. अशाप्रकारे बॉल आउटमध्ये भारताने 3-0 ने हा सामना जिंकला होता.

पुढे अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला 7 धावांनी हरवत टी20 विश्वचषक जिंकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाने लॉन्च केली नवी जर्सी, पाहा त्यात काय आहे विशेष?
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---