---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाण्या दिवसाची वर्षपूर्ती! अवघ्या ३६ धावांवर विराटसेना झालेली ढेर

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 11:32 AM
india all out 36
---Advertisement---

सध्या सर्वत्र विराट कोहलीची चर्चा सुरू आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला असून, दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होईल. या मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु १९ डिसेंबर २०२० हा दिवस विराट कोहली कधीच विसरणार नाही. याच दिवशी कर्णधार म्हणून विराट कोहलीने सर्वात निराशाजनक कामगिरी केली होती.

भारतीय संघाने नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यावर भारतीय संघाने कसोटी मालिका आपल्या नावावर केली होती. परंतु भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ३६ धावांवर संपुष्टात आला होता.(On this day india got all out on 36 runs)

तर झाले असे की, दिवस – रात्र कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४४ धावा केल्या होत्या. यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली होती. तर चेतेश्वर पुजाराने ४३ आणि अजिंक्य रहाणेने ४२ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलिया संघाकडून कर्णधार टीम पेनने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली होती. आर अश्विनने ४, उमेश यादवने ३ आणि जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले होते. या डावात भारतीय संघाने आघाडी घेतली होती.

पहिल्यांदा एकाही फलंदाजाला नाही गाठता आला दुहेरी आकडा

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१९ डिसेंबर) भारतीय संघातील फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आले होते. या डावात भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले होते, जेव्हा संघातील ११ फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले होते. या डावात मयंक अगरवालने सर्वाधिक ९ धावांची खेळी केली होती. तर ३ खेळाडू शून्यावर बाद झाले होते. विराट कोहलीला या डावात अवघ्या ४ धावा करता आल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना जोस हेजलवूडने सर्वाधिक ५ आणि पॅट कमिन्सने ४ गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले होते. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला. परंतु ही मालिका भारतीय संघाने २-१ ने आपल्या नावावर केली होती.

 महत्वाच्या बातम्या – 

स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर

लिएंडर पेस राजकारणाच्या कोर्टमध्ये! ‘या’ पक्षासाठी गोव्यातून लढवणार निवडणूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---