सन १९९९ मध्ये उघडकीस आलेले मॅच फिक्सिंग प्रकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाणी घटना होती. अनुक्रमे भारत व दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार असलेले मोहम्मद अजहरुद्दीन आणि हॅन्सी क्रोनिए यांची कारकीर्द या घटनेने संपुष्टात आली. याचबरोबर अनेक आजी माजी खेळाडूंचे हात या मॅच फिक्सिंगच्या दगडाखाली सापडले. याचा सर्वात जास्त फटका भारतीय संघाला बसला. अझरुद्दीनसोबत अजय शर्मा, अजय जडेजा, मनोज प्रभाकर यांच्यासारख्या खेळाडूची कारकीर्द या घटनेनंतर संपली. मात्र, १९९९ मध्ये उजेडात आलेल्या या घटनेचा पहिला अध्याय सन १९९४ ला लिहिला गेला होता. या पहिल्या अध्यायातील पात्रे होती नयन मोंगिया आणि मनोज प्रभाकर. यापैकी मोंगियाचा आज वाढदिवस.
विल्स वर्ल्ड सिरीज १९९४
भारताने १९९४ मध्ये विल्स वर्ल्ड सिरीज या तिरंगी मालिकेचे आयोजन केले होते. अंतिम सामन्यासह भारत, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड यांच्यात सात सामने डबल राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जाणार होते. वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. भारताने आपले पहिले दोन सामने जिंकले आणि अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील, दुसरा साखळी सामना कानपूरमध्ये होणार होता. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी वेस्ट इंडीजला या सामन्यात विजय अनिवार्य होता.
वेस्ट इंडीजची दमदार फलंदाजी
भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवत, वेस्ट इंडीजच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचली. फिल सिमन्स आणि स्टुअर्ट विल्यम्स यांना सचिन तेंडुलकरने काही धावांच्या अंतरात बाद केले. सिमन्स ६५ तर विल्यम्स ४५ धावा करु शकले. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ११५ धावा जोडल्या. वेस्ट इंडीजची ११५-० पासून १३०-३ अशी घसरगुंडी उडाली. मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या, किथ आर्थरटॉनने ६२ चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह ७२ धावा केल्या. वेस्ट इंडीज संघाने अखेरच्या पाच षटकांत ४९ धावा केल्या आणि आपली धावसंख्या २५७-६ पर्यंत पोहोचवली.
भारताचा डाव आणि मनोज प्रभाकरने टाकला नांगर
भारतीय संघ वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. सुरुवातीपासूनच, इतर फलंदाज आक्रमकपणे तर मनोज प्रभाकर एक बाजू लावून खेळत होते. वेस्ट इंडीजचे गोलंदाज देखील, भारतीय फलंदाजांना जास्त फटकेबाजी करण्याची संधी देत नव्हते. ४१ व्या षटकापर्यंत भारताची स्थिती १९५-५ अशी होती. भारताला विजयासाठी ९ षटकांत ६३ धावा हव्या होत्या. मनोज प्रभाकरच्या साथीला आला यष्टीरक्षक नयन मोंगिया. सामन्याचे पारडे अजूनही भारताच्या बाजूने होते. प्रभाकर आणि मोंगिया यांनी त्यानंतर जे केले; ते फक्त आश्चर्यचकित करणारे होते.
मोंगिया-प्रभाकरच्या कासवगती फलंदाजीने भारताचा पराभव
भारतीय संघ विजयी लक्ष सहज गाठेल, असे वाटत असतानाच, प्रभाकर आणि मोंगिया जोडीने कासवगतीने भारताचा डाव पुढे नेला. पहिल्या चार षटकात त्यांनी फक्त ५ धावा जोडल्या. अखेरच्या पाच षटकात त्यांनी ११ धावा काढल्याने भारताचा ४६ धावांनी पराभव झाला. प्रभाकर आणि मोंगिया जोडीवर प्रचंड टीका झाली. याच सामन्यात, वेस्ट इंडिज संघ फलंदाजी करत असताना; विनोद कांबळी याच्या फेकीवर, अँडरसन कमिन्स याला धावबाद करण्याची सोपी संधी मोंगियाने दवडली होती. भारतीय डावाच्या अंती, मनोज प्रभाकर १५४ चेंडूत १०२ तर नयन मोंगिया २१ चेंडूमध्ये ४ धावा काढून नाबाद राहिले होते.
दोन्ही खेळाडूंचे निलंबन
सामना संपल्यानंतर, सामनाधिकारी असलेल्या आर. सुब्बाराव यांनी; भारतीय संघाचे जाणून-बुजून धीम्या गतीने सामना खेळल्यामुळे, भारतीय संघाचे दोन गुण वजा केले. तुलनेने कमजोर असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला अंतिम फेरीत खेळायचे होते असा त्यांनी आरोप केला. पुढे, आयसीसीने सुब्बाराव यांचा निर्णय अमान्य करत असा निर्णय घेण्याची सामनाधिकाऱ्यांना परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. मनोज प्रभाकर व नयन मोंगिया यांना उर्वरित मालिकेतून बाहेर करण्यात आले. त्यांच्या जागी विजय यादव आणि चेतन शर्मा यांना संघात स्थान देण्यात आले. या सामन्यातील भारतीय संघाच्या कामगिरीची चौकशी करण्यासाठी न्यायाधीश वाय.वी. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली.
मनोज प्रभाकरने केले संघ व्यवस्थापनावर आरोप
मनोज प्रभाकरने सन १९९७ मध्ये एका मुलाखतीत, या सामन्याविषयी विचारले असता स्पष्ट केले की, “नयन मोंगिया ज्यावेळी फलंदाजीला आला; त्यावेळी त्याने मला सांगितले की, आपण फक्त लक्ष्याच्या जवळ जायचे आहे. संघ व्यवस्थापनाने तसे निर्देश दिले आहेत. त्या सामन्यात मी जे खेळलो, ते संघाच्या सांगण्यावरून खेळलो.”
जयवंत लेले यांचा खुलासा
तत्कालीन भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेल्या जयवंत लेले यांनी ‘आय वॉज देअर’ या पुस्तकात उल्लेख केला होता की, “सचिन आणि द्रविडला मोंगिया मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्याबाबत खात्री होती. मात्र, मला वाटत नाही कोणत्या भारतीय खेळाडूने फिक्सींग केले असेल.”
मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित ‘अझर’ या चित्रपटात मनोज प्रभाकर आणि नयन मोंगिया यांच्यातील या वादग्रस्त भागीदारीचा उल्लेख करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलावाची उस्तुकता शिगेला! चेन्नई संघ ‘या’ ५ खेळाडूंवर लावू शकतो मोठी बोली
एक असा गुजराती, ज्याच्या आजीच्या स्वप्नांनी भरलं पंखात बळ; आज इंग्लंडविरुद्ध करतोय कसोटी पदार्पण