ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान गुरुवारपासून (१७ डिसेंबर) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला आरंभ झाला. ऍडलेड येथे सुरू झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीचा पहिला दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी भारताचे प्रमुख ६ फलंदाज २३३ धावांवर बाद करत, भारताला रोखले आहे. भारताने २३३ ही धावसंख्या कर्णधार विराट कोहलीच्या ७४ धावांच्या खेळीमुळे उभारली. विराट १६ धावांवर खेळत असताना त्याला एक जीवदान मिळाले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्याने विराट बाद झाला नाही.
असा झाला होता विराट बाद
त्याचं झालं असं की, ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायन भारताच्या पहिल्या डावातील ४६ वे षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी भारताकडून कर्णधार विराट कोहली स्ट्राइकवर होता. लायनने मधल्या यष्टीवर टाकलेला चेंडू वळण घेत, कोहलीच्या ग्लोव्हजला हलकासा चाटून यष्टीरक्षक कर्णधार टीम पेनच्या हाती विसावला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. मात्र, त्या अपीलमध्ये विश्वास नव्हता. कर्णधार पेनने डीआरएस घेण्यासाठी शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या मॅथ्यू वेडकडे, चेंडू कोहलीच्या ग्लोव्हजला लागला आहे की नाही, याबाबत विचारणा केली. वेडने खात्रीशीर सांगू शकत नसल्याचे म्हटले आणि ऑस्ट्रेलियाने तो डीआरएस घेतला नाही.
पुढच्या चेंडूनंतर ज्यावेळी रिप्ले दाखवला गेला, तेव्हा त्यामध्ये चेंडू अगदी हलकासा कोहलीच्या ग्लोव्हजला लागलेला स्पष्टपणे दिसला. त्यावेळी विराट ४७ चेंडूंमध्ये १६ धावा काढून नाबाद होता, तर भारताची धावसंख्या २ बाद ६६ अशी होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने डीआरएस न घेतल्याच्या निर्णयावर समालोचन करणाऱ्या ब्रेटलीने आश्चर्य व्यक्त केले.
विराटने उठवला जीवदानाचा फायदा
विराटने १६ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला. विराटने या जीवदानानंतर १८० चेंडूत ७४ धावांची लाजवाब खेळी केली. ७७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धावबाद झाल्याने त्याची ही खेळी संपुष्टात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैव! तब्बल १७ वर्षानंतर भारतीय कर्णधारासोबत ऑस्ट्रेलियात घडली ‘अशी’ घटना
‘सर्व कसोटी सामन्यात केला पाहिजे ‘या’ चेंडूचा वापर’, महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे मत
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी