रविवारी झालेल्या आशिया कप (Asia Cup 2025) रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना झाला. सामना सुरू होण्यापूर्वी जेव्हा दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले, तेव्हा एकाही खेळाडूने एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. आशिया कप 2025 आणि महिला वर्ल्ड कपनंतर या स्पर्धेतही भारताने पाकिस्तानविरुद्ध नो हँडशेक पॉलिसी चालू ठेवली आहे. आशिया कप 2025 मध्ये भारत–पाकिस्तानचे 3 सामने झाले होते आणि त्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंच्या हातात हात घातला नव्हता.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत जीतेश शर्मा इंडिया A संघाचे नेतृत्व करत आहे. आशिया कप आणि महिला वर्ल्ड कपमध्ये जसं टॉसच्या वेळी भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नव्हते, तसंच इथंही तेच सुरू आहे.
आशिया कपच्या ट्रॉफीवरूनही मोठा वाद झाला होता. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने पाक खेळाडूंशी हात मिळवणे टाळले होते. आणि फायनलमध्ये पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे प्रेझेंटेशन सेरेमनी तब्बल 90 मिनिटे उशिरा सुरू झाली.
आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात यूएईवर 148 धावांनी मोठा विजय मिळवला. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने फक्त 42 चेंडूत 144 धावा केल्या होत्या. त्याने 15 षटकार आणि 11 चौकार लगावले. टीम इंडियाने (Team india) त्या सामन्यात एकूण 297 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात यूएईची टीम फक्त 149 धावांवर गडगडली.





