भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारीपासून (१२ मार्च) दुसरा कसोटी सामना (Bengaluru Test) सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात (Day -Night Test) खेळवला जाणार आहे. या दिवस-रात्र कसोटी सामन्याला गुलाबी चेंडू कसोटी (Pink Ball Test) असेही म्हणतात. कारण हा कसोटी सामना लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूने खेळवला जातो.
गेल्या ५ वर्षांमध्ये एकूण १८ दिवस-रात्र सामने खेळले गेले आहेत आणि या सर्व सामन्यांचा निकाल लागला आहे. यातील दोन तृतीयांश सामने ४ किंवा त्यापेक्षा कमी दिवसांमध्ये संपले आहेत. यापैकी केवळ ६ सामने पूर्ण पाच दिवस चालले आहेत. तर १२ कसोटी सामन्यांचा निकाल ४ किंवा त्यापेक्षा कमी दिवसांमध्ये संपला आहे.
भारताने केव्हा-केव्हा खेळलाय दिवस-रात्र कसोटी सामना?
भारतीय संघाने आतापर्यंत ३ दिवस-रात्र कसोटी सामने खेळले (Team India Pink Ball Test Stats) आहेत. यातील २ सामने भारतीय संघाने स्वदेशात खेळले आहेत, तर एक सामना ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला गेला आहे. नोव्हेंबर २०१९ साली बांगलादेशविरुद्ध भारताने पहिल्यांदा दिवस-रात्र सामना खेळला होता, जो त्यांनी ३ दिवसांमध्ये जिंकला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडमध्ये डिसेंबर २०२० मध्ये भारताने दुसऱ्यांदा दिवस-रात्र सामना खेळला होता. भारतीय संघाने हा सामना गमावला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळताना भारताने केवळ २ दिवसांमध्ये विजय मिळवला होता. हा सामना भारतातच झाला होता.
अर्थात भारतीय संघाने आतापर्यंत मायदेशात खेळलेले दोन्ही दिवस-रात्र कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे श्रीलंकेच्या संघासाठी ही धोक्यासाठी घंटा असेल.
भारत वि. श्रीलंका संघातील कसोटी आकडेवारी
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील आतापर्यंतच्या कसोटी आकड्यांवर नजर टाकायची झाल्यास, उभय संघांनी आतापर्यंत ४५ कसोटी सामने खेळले आहेत. यातील २१ सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आहे. तर श्रीलंकेने ७ सामन्यात भारताला पराभूत केले आहे. उर्वरित १७ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारतातील मैदानांवर आतापर्यंत २१ वेळा हे संघ कसोटी सामन्यासाठी आमने सामने आले आहेत. यातील १२ सामने भारताने जिंकले आहेत, तर ९ सामने अनिर्णीत राहिले आहेत. अर्थात भारताने आतापर्यंत घरच्या मैदानांवर श्रीलंकेविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकात मिताली राज भारताची कर्णधार ‘नंबर वन’! धोनी, अझरुद्दीन यांनाही टाकले मागे
हरमनप्रीत कौरचा वेस्ट इंडिजला दे दणादण, विश्वचषक सामन्यात शतक झळकावत बनली अव्वल
हरमनप्रीतचा मोठा पराक्रम! १०९ धावांची खेळी करताच विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय