सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये पाच टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामने पूर्ण झाले असून दोन्ही सामन्यांत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत २-० ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासाठी आज होणारा तिसरा टी२० सामना खूप महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेला मालिकेत अजेय आघाडी घेण्यापासून रोखण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. येथे आतापर्यंत दोन टी२० सामने झाले आहेत. भारतीय संघाने या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या मोठ्या सामन्यापूर्वी या खेळपट्टीच्या टी२० विक्रमांवर एक नजर टाकूयात.
खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत आहे
या खेळपट्टीवरील दोन टी२० सामन्यांवर नजर टाकली तर येथे गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. २०१६ मध्ये येथे पहिला टी२० सामना झाला होता, ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ अवघ्या ८२ धावांत ऑलआऊट झाला होता. भारताने हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी ७ विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ केवळ १२६ धावाच करू शकला, जिथे ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत सामना जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना समान मदत मिळाली. अशा स्थितीत आजच्या सामन्यातही येथे गोलंदाजांची मदत मिळणे अपेक्षित आहे.
नाणेफेकीची भूमिका
या खेळपट्टीवरील दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याआधीच्या दोन्ही सामन्यात नाणेफेक गमावूनही सामना गमावलेल्या रिषभ पंतला यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत मानसिक संतुलन मिळवण्याची अपेक्षा असेल.
विशाखापट्टणममधील टी२० सामन्यांची आकडेवारी
सर्वोच्च धावसंख्या: १२७ धावा (ऑस्ट्रेलिया)
किमान धावसंख्या: ८२ धावा (श्रीलंका)
सर्वाधिक धावा: ग्लेन मॅक्सवेल (५६ धावा)
सर्वाधिक बळी : आर अश्विन (४ विकेट)
सर्वोत्कृष्ट इकॉनॉमी रेट: आर अश्विन (२ धावा/ओव्हर)
दरम्यान, विशाखापट्टनम मधील खेळपट्टीचा विचार करता मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत भारताचा युवा फिरकीपटू रवि बिश्नोईला संघात घेतले जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे जर रवि बिश्नोईला संघात सामील करून घेतले तर अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या अक्षर पटेलला संघातून बाहेर जावे लागू शकते, जर असे झाले तर संघाच्या फलंदाजीतील समतोल बिघडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता संघात काय बदल होतील याकडे लक्ष लागले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियावर येणार ‘ती’ नकोशी वेळ; दक्षिण आफ्रिका ठरणार का कारण?
INDvsSA : तिसऱ्या टी२०साठी भारतीय ‘प्लेईंग एलेव्हन’मध्ये होऊ शकतात ‘हे’ तीन बदल
सुशांत सिंग राजपूत होता धोनीचा कट्टर फॅन, ‘या’ वर्षी पहिल्यांदा काढला होता धोनीबरोबर फोटो