टी२० क्रिकेट हे झटपट क्रिकेट म्हणून ओळखले जाते. यात चौकार- षटकारांची आतिषबाजी पहायला मिळते. दोन्ही संघ मिळून जेमतेम २४० चेंडू खेळतात. परंतु यात खरी कसोटी लागते ती गोलंदाजांची.
फलंदाज हे सतत गोलंदाजांवर या प्रकारात वर्चस्व गाजवत असतात. यात अनेक वेळा धावांची गती वाढविण्यासाठी षटाकर चौकारांची आतिषबाजी होतेच. अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी या प्रकारात १०० पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. काही असेही फलंदाज आहेत, ज्यांनी २०० पेक्षा जास्त चौकार मारले आहेत.
परंतु काही असे खेळाडू आहेत, ज्यांनी या प्रकारात एकही चौकार मारला नाही. विशेष म्हणजे जगात अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिले दोन खेळाडू हे भारतीय आहेत. याला कारण म्हणजे हे खेळाडू खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येतात. त्यामुळे त्यांना खूप कमी चेंडू खेळायला मिळतात किंवा फलंदाजीची संधी मिळत नाहीत. येथे त्यांची सामन्यांची संख्या मात्र वाढते परंतु फलंदाजीचे विक्रम मात्र कोणते होत नाही.
गम्मत वाटेल पण, भुवनेश्वर कुमारने या प्रकारात ४३ सामन्यांत ९ वेळा फलंदाजी करताना २३ धावा केल्या आहेत. परंतु त्याला एकदाही चौकार मारता आलेला नाही. भुवी बऱ्याच वेळा चांगली फलंदाजी करताना आपण वनडे व कसोटीत पाहिले आहे. परंतु त्याला टी२० मध्ये एकही चौकार मारता न यावा हे मात्र आश्चर्य आहे. त्यात त्याला जास्त फलंदाजीही या प्रकारात करायला मिळाली नाही. तसेच या प्रकारात त्याने एकही षटकार देखील मारला नाही.
युझवेंद्र चहलने या प्रकारात ४२ सामने खेळताना केवळ ४ वेळा फलंदाजी केली आहे. यात त्याने केवळ ५ धावा केल्या आहेत. त्यालाही या प्रकारात एकही षटकार किंवा एकही चौकार मारता आलेला नाही.
झहीर खान (१७ सामने), खलील अहमद (१४ सामने), दिपक चहर (१० सामने), प्रविण कुमार (१० सामने), आरपी सिंग (१० सामने) यांनीही या प्रकारात एकही चौकार मारला नाही. तर मोहम्मद शमी व जयदेव उनाडकत यांना यात कधीही फलंदाजीची संधी मिळाली नाही.
झहीर खानने मात्र या प्रकारात एक षटाकार मारला आहे. झहीरप्रमाणेच प्रग्यान ओझानेही या प्रकारत कधीही चौकार मारला नाही परंतु एक खणखणीत षटकार खेचला आहे.
राहुल द्रविडने टी२० क्रिकेटमध्ये केवळ एक सामना खेळला असून त्यात त्याने एकही चौकार मारला नाही परंतु ३ षटकारांची बरसात केली होती.