3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर पार पडणार आहे. पण सध्या दिल्लीमध्ये हवा प्रदुषण वाढले आहे. परंतू असे असतानाही पहिला टी20 सामना ठरलेल्या नियोजनानुसार दिल्लीतच होणार आहे.
त्यामुळे भारत आणि बांगलादेशचे खेळाडू भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पोहचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.
पण दिल्लीतील प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्हणून बांगलादेशच्या खेळांडूनी सरावादरम्यान मास्क घातले होते . बांगलादेशी किक्रेटपटू लिटन दास मास्क घालून सराव करताना दिसून आला आहे.
दिवाळीनंतर दिल्लीतील हवा प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. त्यामुळे हा सामना दिल्लीतून हलवण्यासाठी मागणी होत होती. परंतू बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने हा सामना दिल्लीमध्येच पार पडेल असे स्पष्ट केले आहे.
2017 मध्येही भारत-श्रीलंका संघात दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंना प्रदुषणाचा त्रास झाला होता. त्यावेळीही श्रीलंकेच्या खेळाडूंनी मास्क घालण्याचा पर्यायाचा वापर केला होता.






