2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज पदार्पण करणारा पृथ्वी शॉ आज करिअराच्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. एकेकाळी “पुढचा सचिन तेंडुलकर” अशी ओळख मिळवलेला हा खेळाडू आज ना मुंबईच्या रणजी संघात आहे, ना आयपीएल 2025 च्या लिलावात कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या चुकांबद्दल, एकटेपणाबद्दल आणि संघर्षाबद्दल मोकळेपणाने सांगितले.
2018 मध्ये भारताकडून टेस्ट डेब्यू करताच पृथ्वी शॉने शानदार शतक झळकावले होते. त्यानंतर भारताचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्याची तुलना ब्रायन लारा, वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांशी केली होती. मात्र पुढील काही वर्षांतच शॉचे प्रदर्शन घसरू लागले आणि 2021 नंतर त्याला भारतीय संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्या फॉर्ममध्ये सातत्याने घसरण होत गेली आणि आज 2025मध्ये त्याला मुंबई रणजी संघातूनही वगळण्यात आले. आयपीएल 2025 च्या लिलावातसुद्धा कोणत्याही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवलेला नाही.
न्यूज 24ला दिलेल्या मुलाखतीत 25वर्षीय शॉ म्हणाला, “मी माझ्या करिअरमध्ये अनेक चुकीचे निर्णय घेतले. क्रिकेटकडे लक्ष द्यायचं कमी केलं. आधी मी दिवसातून 8 तास सराव करायचो, पण नंतर तो वेळ 4 तासांवर आला.”
तो पुढे म्हणाला, “मी जेव्हा सगळ्यात वाईट काळ अनुभवत होतो, तेव्हा टीम इंडियातील कोणत्याही मोठ्या खेळाडूने मला फोन करून विचारपूस केली नाही. फक्त रिषभ पंतनेच माझ्याशी संपर्क साधला.” शॉने मान्य केलं की यशाच्या टप्प्यावर असताना त्याच्या आजूबाजूला अनेक ‘दोस्त’ निर्माण झाले आणि त्यांनी त्याला चुकीच्या दिशेने नेले. त्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालं आणि त्याचा सराव, फोकस सगळं बिघडलं.
पुढे शॉ म्हणला, “या काळात फक्त सचिन सरच होते ज्यांनी मला समजावलं. त्यांनी मला आणि अर्जुनला एकत्र खेळताना पाहिलं आहे. मी अनेक वेळा त्यांच्या घरीही गेलो आहे. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं.”