इराणी चषकाचा सामना सध्या लखनऊमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईच्या संघासमोर रेस्ट ऑफ इंडियाचं आव्हान आहे. चौथ्या दिवशी रेस्ट ऑफ इंडियाचा पहिला डाव 416 धावांवर संपला. यासह मुंबईला 121 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉनं मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली. त्यानं एका टोकाकडून स्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. आजच्या खेळाच्या दुसऱ्या सत्राअखेर मुंबईनं 15 षटकांत 2 गडी गमावून 85 धावा केल्या होत्या. शॉ अजूनही क्रीजवर उपस्थित आहे.
या सामन्यात मुंबईच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉ काही खास करू शकला नाही. त्यानं केवळ 4 धावा केल्या होत्या. तो मुकेश कुमारच्या चेंडूवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये झेलबाद झाला. यानंतर त्याला खूप ट्रोल देखील केलं गेलं. परंतु आता त्यानं दुसऱ्या डावात स्फोटक फलंदाजी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.
शॉनं दुसऱ्या डावात मुकेशसह प्रसिद्ध कृष्णाला देखील सोडलं नाही. शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्यानं अवघ्या 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. चहापानापर्यंत शॉनं 46 चेंडूत 58 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
पृथ्वी शॉ एकेकाळी भारतातील सर्वात प्रतिभावान खेळाडूंमध्ये गणला जायचा. त्यानं त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा गोळा केल्या होत्या. यानंतर त्यानं भारतासाठी कसोटी पदार्पणात शतक झळकावलं. मात्र शानदार सुरुवात करूनही शॉची कारकीर्द उंचीवर जाण्याऐवजी खाली गेली. आता परिस्थिती अशी आहे की तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग नाही.
पृथ्वी शॉनं 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून तो भारतीय संघात संधीची वाट पाहत आहे. आता आगामी रणजी हंगामात भरपूर धावा करून तो भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा –
शतकाच्या अगदी जवळ येऊनही दूर राहिला भारतीय खेळाडू, एका चुकीमुळे झालं मोठं नुकसान
मुलीला भेटल्यानंतर हसीन जहाँचे शमीवर गंभीर आरोप; म्हणाली, “तो फक्त दाखवण्यासाठी…”
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया सामना ड्रॉ झाला, तर कोणता संघ ठरेल इराणी चषकाचा विजेता? नियम जाणून घ्या