पुणे | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषीत केला. दुसऱ्या दिवसाची काही षटके बाकी असताना मैदानावर फलंदाजी करत असलेल्या कर्णधार कोहलीने जडेजा बाद झाल्यावर लगेच डाव घोषीत केला.
जडेजा जेव्हा बाद झाला तेव्हा तो ९१ धावांवर खेळत होता तर विराट कोहली नाबाद २५४ धावांवर.
आज विराटला या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील पहिले वाहिले त्रिशतक करण्याचीही संधी होती परंतु विराटने लगेच डाव घोषीत केला. तरीही विराटच्या कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमधील या सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत.
यापुर्वी विराटच्या कसोटीतील सर्वोत्तम धावा २४३ होत्या. दिल्ली कसोटीत २०१७-१८ हंगामात विराटने श्रीलंकेविरुद्ध या धावा केल्या होत्या. परंतु विराटने आज आपलाच वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. यामुळे पुणे विराटसाठी खऱ्या अर्थाने लकी ठरले आहे.
विराटने वनडेत १८३, टी२० ९० तर आता कसोटीत नाबाद २५४ धावा केल्या आहेत. याच विराटच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील डावातील सर्वोत्तम धावा आहेत.