भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन हा परदेशातील मैदानांवर सरासरी गोलंदाजी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापुर्वी त्याच्या प्रदर्शनासंदर्भात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. परंतु अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत पुन्हा एकदा सर्वांना आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यानंतर अश्विनने स्वत:ला सेना (SENA) देशांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा भारतीय फिरकीपटू असल्याचे सांगितले आहे.
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ३ सामने खेळले आहेत. या सामन्यांतील ६ डावात गोलंदाजी करताना त्याने २८.८३च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला सर्वाधिक ३ वेळा तंबूत धाडले आहे.
ऑस्ट्रेलियातील अप्रतिम कामगिरीनंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अश्विन म्हणाला की, “मला भारतीय संघातील माझ्या जागेसाठी लढायचे आहे. यासाठी मी अधिकाधिक विकेट्स घेणे गरजेचे आहे. जर मागील दोन-तीन वर्षातील न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना देश) दौऱ्यांतील आकडेवारींची पाने चाळली; तर मी इतकी उत्तम गोलंदाजी केली आहे की, स्वत:ला भारताचा सवोत्कृष्ट फिरकीपटू संबोधू शकू.”
अश्विनने गेल्या ३ वर्षात सेना देशात घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
अश्विनच्या म्हणण्यानुसार, खरोखरच त्याने सेना देशात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. मागील ३ वर्षात सेना देशांविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक ३२ विकेट्स काढल्या आहेत. याबाबतीत अष्टपैलू रविंद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर आहे. सेना देशांविरुद्ध मागील ३ वर्षात ६ कसोटी सामने खेळत त्याने एकूण २३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही रुटची कमाल! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर
दोन हजाराहून अधिक कसोटी सामने झाले, पण ‘असा’ विक्रम पहिल्यांदाच झाला