विराट कोहलीने त्याच्या आवडत्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कोहलीने भावनिक पोस्ट लिहून त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. कोहली निवृत्त होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला. हरभजन सिंग, इरफान पठाण ते एबी डिव्हिलियर्सपर्यंत सर्वांनी कोहलीच्या शानदार कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले आहे.
अजिंक्य रहाणेने देखील विराट साठी खास स्टोरी शेअर केली आहे. अजिंक्य रहाणेने विराट सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अजिंक्य रहाणेने म्हटले आहे की ‘विराट कोहली, तुझ्यासोबत मैदान शेअर करण्याचा हा एक खास प्रवास होता. एकत्र खूप छान आठवणी आणि भागीदारी. एका अद्भुत कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन.’
त्याच्या 14 वर्षांच्या दीर्घ कसोटी कारकिर्दीत, विराट कोहलीने फलंदाज म्हणून सर्वकाही साध्य केले. 2011 मध्ये कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच फलंदाजी केली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरला. तेव्हा कदाचित कोणीही विचार केला नसेल की कोहली इतका ‘विराट’ झाल्यानंतर या फॉरमॅटला निरोप देईल. कोहलीने भारतासाठी पांढऱ्या जर्सीमध्ये 123 कसोटी सामने खेळले. या काळात, किंग कोहलीने 210 डावांमध्ये 46 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. विराटच्या बॅटमधून 30 शतके आली आणि त्याने 31 वेळा अर्धशतक ओलांडले.