इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून केएल राहुल (KL Rahul) जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी निवृत्तीनंतर राहुलने त्याची जागा घेतली असून, ती भूमिका तो उत्तम प्रकारे पार पाडत आहे.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी राहुलने आपल्या फलंदाजीत थोडे तांत्रिक बदल केले आणि त्याचा फायदा त्याला चांगलाच मिळतं आहे. याच फलंदाजीबद्दल भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी भाष्य केले आहे.
ICC रिव्ह्यूमध्ये बोलताना शास्त्री म्हणाले, माझ्या मते जगात असा एकही माणूस नसेल ज्याने राहुलच्या क्षमतेला नाकारलं असेल किंवा म्हटलं असेल की त्याच्यात प्रतिभा नाही. लोकांना एवढंच वाटायचं की त्याच्याकडे एवढी प्रतिभा असूनही तो सातत्यानं चांगला खेळ का करत नाही? पण या मालिकेत आपण राहुलचा सर्वोत्तम खेळ पाहत आहोत.
ते पुढे म्हणाले, मी पाहिलं की त्याने आपल्या फ्रंट-फुट, स्टान्स आणि डिफेन्समध्ये थोडे बदल केले आहेत. अगदी जेव्हा तो मिडविकेटच्या दिशेने मारतो, तेव्हाही बॅटचा संपूर्ण भाग चेंडूवर असतो. या बदलामुळे त्याला जुन्या चुका टाळता आल्या आहेत. विशेषत एलबीडब्ल्यू किंवा बोल्ड होण्याच्या प्रकारांपासून. आधी बॅट बंद ठेवून तो अडचणीत यायचा, आता तसं होत नाही.
राहुलने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. लीड्स येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात त्याने 42 आणि 137 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून 2 आणि 55 धावा आल्या. तर तिसऱ्या सामन्यात त्याने 100 आणि 39 धावा केल्या. भारतासाठी तो सातत्याने धावा करत आहे. आतापर्यंत 3 सामन्यांत त्याने 62.50 च्या सरासरीने एकूण 375 धावा केल्या आहेत.






