सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात सुरु असलेल्या चौथ्या टी २० सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव १५.३ षटकांवर ३ बाद १३० धावांवर थांबला आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करताना दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला साजेशी कामगिरी भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फलंदाज लिझेल ली आणि कर्णधार डेन व्हॅन निएकर्क यांनी १०३ धावांची शतकी सलामी दिली.
या दोघींची जोडी फोडण्यात दीप्ती शर्माला यश आले. तिने व्हॅन निएकर्कला ४७ चेंडूत ५५ धावांवर असताना बाद केले. तर ली अजूनही नाबाद खेळत असून तिने आक्रमक खेळताना ५ षटकार आणि २ चौकारांच्या साहाय्याने ३८ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या आहेत.
व्हॅन निएकर्क बाद झाल्यानंतर लगेचच मागील काही सामन्यात स्फोटक खेळणारी क्लो ट्रायऑन(२) आज लवकर बाद झाली. तिला पूनम यादवने बाद करून दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. तिच्यापाठोपाठ सून लूसलाही(५) दीप्ती शर्माने पायचीत बाद करून दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट घेतली.
सध्या लिझेल ली आणि मिग्नॉन द्यू प्रीझ(२*) या दोघी नाबाद आहेत.
जर सामना आत्ता सुरु झाला तर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतासमोर १५ षटकात १४८ धावांचे आव्हान असेल. जर अजूनही सामना पुढे सरकला तर १० षटकात १०९ किंवा ५ षटकात ६१ धावांचे लक्ष्य भारतासमोर असेल.