केवळ भारतातच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहलीच्या खराब फॉर्मची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेला भारतीय संघाचा इंग्लंड दौरा देखील त्याच्यासाठी मनासारखा राहिला नाही. इतकेच नव्हे तर मागील तीन वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही. भारतीय संघासह वेस्ट इंडीज दौऱ्यावरही वनडे व टी२० मालिकेसाठी त्याने न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात तो लंडन येथे आपल्या कुटुंबासह वेळ घालवेल. मात्र, त्यानंतर तो बॅक टू बेसिक्स हे तंत्र अवलंबू शकतो. याबाबत त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी एक वक्तव्य केले आहे.
विराटचा सध्याचा खराब फॉर्म पाहता त्याला लवकरच आपल्या खेळात सुधारणा करावी लागेल. यासाठी तो जिथे क्रिकेटची बाराखडी शिकला तेथे पुन्हा एकदा जाऊ शकतो. विराटने आपल्या क्रिकेटची सुरुवात दिल्ली येथील क्रिकेट प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडे केली होती. शर्मा यांना अपेक्षा आहे की, विराट ब्रेक दरम्यान पुन्हा एकदा अकादमीत येऊन सराव करेल. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,
“विराट कोहली ब्रेक दरम्यान येथे येऊ शकतो. त्याने तसे केले तर आम्ही एकत्रित मिळून त्याला होत असलेल्या समस्यांवर काम करू. हे विराटचे स्वतःचे मैदान आहे. आधी त्याच्याकडे वेळ नसायचा. मात्र, सध्या त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. या काळात तो येथे आला तर मला नक्कीच आनंद होईल.” विराटने यापूर्वी देखील अपयशी ठरत असताना अनेक वेळा शर्मा यांचा सल्ला घेतला आहे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराटने आपल्या या लहानपणीच्या अकादमीत येऊन तंत्र सुधारण्यावर भर दिला होता. सध्या इंग्लंडमध्ये असलेला विराट आपली पत्नी अनुष्का, मुलगी वामिका व आईसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतोय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॉमनवेल्थआधीच भारतीय क्रीडाक्षेत्रात खळबळ! वाचा सविस्तर वृत्त
हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ





