आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या बहुचर्चित हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केलेली दिसून येतेय. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सने देखील या हंगामासाठी कंबर कसली आहे. लिलावानंतर, मुंबईचा संघ चांगलाच मजबूत दिसत आहे. त्याचवेळी, मुंबई इंडियन्सने भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याला आपल्या संघात का निवडले, याचा खुलासा मुंबईच्या प्रशिक्षकांनी केला आहे.
आयपीएल लिलावात चावला झाला मुंबईकर
आयपीएलच्या मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणाऱ्या पियुष चावलाला चेन्नईने आयपीएल २०२१ च्या लिलावाआधी करारमुक्त केले होते. त्यानंतर लिलावामध्ये राजस्थान रॉयल्सला पछाडत मुंबई इंडियन्सने २ कोटी ४० लाख रुपयांच्या किमतीत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. पियुष यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्स या संघांचा देखील भाग राहिला होता. कोलकातासोबत २०१२ व २०१४ आयपीएल विजेता होण्याचा मान त्याने मिळविलेला.
मुंबईच्या प्रशिक्षकाने केला खुलासा
भारतातील अनुभवी फिरकीपटूंपैकी एक असलेल्या चावलाला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात का सामील केले? याचा खुलासा मुंबईच्या प्रशिक्षक गटात नव्याने सामील झालेल्या पार्थिव पटेलने केला. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, “पियुष खूप वरिष्ठ खेळाडू आहे. संघाला एका अनुभवी फिरकीपटूची गरज होती. संघ मजबूत असला तरी आम्हाला शंकेला जागा ठेवायची नसल्याने, आम्ही त्याला खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आता आमचे पाच सामने चेन्नईच्या मैदानावर होणार असून, त्या मैदानावर खेळल्याचा फायदा पियुष संघाला करून देईल. तेथील खेळपट्टी त्याला अवगत आहे.”
नव्या खेळाडूंवर मुंबईने दाखवला विश्वास
आत्तापर्यंत पाच वेळा आणि सलग दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने मागील महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंना संघात सामील करून घेण्यावर भर दिला. पियुष चावलासह नॅथन कुल्टर-नाईल व ऍडम मिल्ने, जिमी निशाम या अनुभवी खेळाडूंना त्यांनी संधी दिली. अर्जुन तेंडुलकर, मार्को जेसन, युद्धवीर चरक हे युवा खेळाडू प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीच्या रूमच्या दारावर लागली हटके नेम-प्लेट, जाणून घ्या काय आहे कारण