रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत 8 गडी राखून पराभव पत्कारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतानं किवी संघासमोर विजयासाठी फक्त 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. संघानं पाचव्या दिवशी 2 विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं. पहिल्या कसोटीत असं काय झालं, ज्यामुळे भारतीय संघाला एवढा दारुण पराभव पत्कारावा लागला? टीम इंडियाच्या पराभवामागची कारणं काय आहेत? हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(1) नाणेफेकीनंतर चुकीचा निर्णय – बंगळुरू कसोटीत वातावरण ढगाळ होतं. पावसामुळे पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून चुकीचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण संघ केवळ 46 धावांत गारद झाला. विराट कोहलीसह पाच खेळाडू खातंही उघडू शकले नाहीत. हा निर्णय घेण्यात चूक झाल्याची कबुली खुद्द रोहितनंही दिली आहे.
(2) डेव्हॉन कॉनवेची फलंदाजी – पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेनं शानदार फलंदाजी केली. त्यानं 105 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 91 धावांची खेळी केली. त्यानं कर्णधार टॉम लॅथम (15) सोबत पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कॉनवेनं विल यंग (33) सोबत मोर्चा सांभाळला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावा जोडून यजमान संघावर दडपण आणलं. कॉनवे 40व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला.
(3) रचिन-साऊदीची भागीदारी – या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रचिन रवींद्रनं 157 चेंडूत 134 धावा केल्या. रचिननं चौथ्या विकेटसाठी डॅरिल मिशेल (18) सोबत 39 धावा जोडल्या. यानंतर काही काळ रचिनला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. मात्र, जेव्हा टीम साऊदी क्रीजवर आला, तेव्हा या दोघांनी शानदार भागीदारी रचली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 137 धावा जोडल्या. दोघांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402 धावा केल्या. ही भागीदारी लवकर तोडण्यात भारताला यश आलं असतं तर कदाचित न्यूझीलंडचा डाव 300 च्या आत आटोपला असता.
(4) राहुल-जडेजा फ्लॉप – सरफराज खान (150), रिषभ पंत (99) आणि विराट कोहली (70) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. मात्र, केएल राहुल (12), अष्टपैलू रवींद्र जडेजा (5) आणि आर अश्विन (15) काही खास करू शकले नाही. या तिघांनीही फलंदाजीत योगदान दिलं असतं, तर भारताला मोठी धावसंख्या उभारता आली असती. भारतानं दुसऱ्या डावात केवळ 54 धावांत शेवटचे 6 गडी गमावले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज शून्यावर परतले.
हेही वाचा –
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताची चिंता वाढली, WTC गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का
IND VS NZ; सामना गमावताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
झिम्बाब्वेचा भीमपराक्रम! भारताचा मोठा रेकॉर्ड अगदी थोडक्यात वाचला