लखनऊ। रणजी ट्रॉफीमध्ये सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रने उत्तरप्रदेशवर 6 विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
यावेळी सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीतील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्षाचा पाठलाग केला आहे. त्यांनी आज उत्तरप्रदेशने दिलेल्या 372 धावांच्या लक्षाचा पाठलाग करत सामना जिंकला आहे. याआधी आसामने 2008-09च्या हंगामात सर्व्हिस विरुद्ध खेळताना 371 धावा लक्षाचा पाठलाग केला होता.
उत्तरप्रदेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत सर्वबाद पहिल्या डावात 385 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात सौराष्ट्रला पहिल्या डावात 208 धावाच करता आल्या. यामुळे उत्तरप्रदेशला मोठी आघाडी मिळाली होती. त्यांनी दुसऱ्या डावातही 194 धावा जोडत सौराष्ट्र समोर 372 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रच्या सलामीवीर हार्विक देसाईने 116 धावा आणि स्नेल पटेलने 72 धावा करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. तर चेतेश्वर पुजाराने त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 50वे अर्धशतक करत नाबाद 67 आणि शेल्डन जॅक्सनने नाबाद 73 धावा केल्या.
तसेच गोलंदाजीत सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने चांगली कामगिरी करताना या सामन्यात पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या.
त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार हार्विक देसाईला मिळाला.
सौराष्ट्र बरोबरच केरळ, विदर्भ आणि कर्नाटक हे संघही रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहचले आहेत. 24 जानेवारीपासून उपांत्य फेरीचे सामने होणार असून यामध्ये केरळ विरुद्ध विदर्भ आणि सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अश्या लढती होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–बाॅल तुमच्या हातात घ्या, नाहीतर म्हणतील धोनी रिटारमेंट घेतोय!
–असा कबड्डीचा सामना तुम्ही १००% पाहिला नसेल…खेलो इंडियात रंगला कबड्डीच्या अंतिम फेरीचा थरार
–खेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता; मुलींमध्ये दिया चितळेला रौप्य






