बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप (२-०) दिला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मालिकेत संघासाठी चांगले प्रदर्शन केले आणि यासाठी त्याला मालिकावीर निवडले गेले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पंत पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे, ज्याला मालिकावीर निवडले गेले आहे.
भारतीय संघात यापूर्वी असा एकही यष्टीरक्षक फलंदाज झाला नाही, ज्याला कसोटी क्रिकेटमध्ये मालिकावीर निवडले गेले असेल. रिषभ पंत (Rishabh Pant) याने मात्र हा मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. मालिकेतील त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ९७ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने ३९, तर दुसऱ्या डावात ५० धावा केल्या.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पहिल्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट अष्टपैलू प्रदर्शन केले होते. फलंदाजीत त्याने नाबाद १७५ धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीत ९ विकेट्स घेतल्या होत्या. यासाठी त्याला पहिल्या सामन्यात सामनावीर निवडले गेले होते. असे असले तरी, दुसऱ्या कसोटीत मात्र तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने अनुक्रमे ४ आणि २२ धावा केल्या आणि एक विकेट घेतली. तसेच दुसऱ्या सामन्यात युवा फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) चांगली फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने ९२, तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने चांगली फलंदाजी केली आणि फलंदाजांसमोर अडथळा निर्माण केला. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने ५, तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घतेल्या. परंतु, पहिल्या सामन्यात तो अवघ्या दोन विकेट्स घेऊ शकला होता. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे प्रदर्शन कौतुकास पात्र होते. अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यांमध्ये प्रत्येकी ६-६ विकेट्स घेतल्या. यादरम्यान अश्विन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्वतःच्या १०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज बनला.
दरम्यान, उभय संघातील दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पूर्ण संघ अवघ्या १०९ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ३०३ धावांवर डाव घोषित केला आणि श्रीलंकेला पुन्हा फलंदाजीची संधी दिली. दुसऱ्या डावात श्रीलंका संघ २०८ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बांग्लादेश संघ आला होता काळाच्या तोंडून बाहेर
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई
हीच ती वेळ, हाच तो क्षण..! कोट्यवधी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पाहा तो सुंदर व्हिडिओ