टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सलामीवीर रोहित शर्माने भारताच्या टी२० विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात महत्वाचे योगदान दिले आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. या सामन्यात भारतासमोर नामिबियाचे आव्हान होते. सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि संघाने त्याच्या जोरावर विजय मिळवला. भारताने या सामन्यात नामिबियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. रोहितने या सामन्यात फलंदाजीमध्ये अर्धशतक आणि क्षेत्ररक्षण करताना तीन झेल घेतले.
रोहितने या सामन्यात एकूण ३६ चेंडूंचा सामना केला आणि ५६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याने या सामन्यात केलेल्या खेळीनंतर स्वत:च्या नावावर एक महत्वाचा विक्रम केला आहे. रोहित टी२० विश्वचषकात एका सामन्यात ५० धावा आणि ३ झेल घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.
याव्यतिरिक्त रोहितने या सामन्यादरम्यान त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३००० धावा करणारा तो विराट कोहलीनंतर दुसरा भारतीय खेळाडू आहे.
याशिवाय त्याने या सामन्यात घेतलेल्या तीन झेलनंतर तो टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वाधिक ४४ झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना संयुक्तरित्या आहेत. या दोघांच्या नावावर ४२ झेल आहेत.
दरम्यान, सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नामिबियाने २० षटकांत ८ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने नामिबियाचे दिलेले १३३ धावांचे लक्ष्य अवघ्या १५.२ षटकात आणि केवळ एक विकेटच्या नुकसानावर गाठले. परिणामी भारतीय संघाने ९ विकेट्स राखून विजय मिळवला.
गोलंदाजांमध्ये भारताच्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम
कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक
“भारतीय क्रिकेटची अवस्था तशीच आहे, जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये”






