भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला. तसेच दुपार नंचर सतत येत असलेल्या पावसामुळे केवळ 35 षटके खेळता आली. ज्यामध्ये बांग्लादेशने 3 गडी गमावून 107 धावा केल्या. पण सर्वात आधी या मैदानावर रोहित शर्माने घेतलेला एक निर्णय चर्चेत आला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांग्लादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याची गेल्या 60 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1964 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो सामना अनिर्णीत राहिला.
गेल्या 9 वर्षांत भारताने आपल्याच भूमीवर कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेवटच्या वेळी असे घडले होते 2015 मध्ये जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. योगायोगाने तो सामनाही अनिर्णित राहिला. बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यासह रोहित शर्मा कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करणारा गेल्या 5 वर्षांतील पहिला कर्णधार ठरला आहे.
सध्याच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 280 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. दुसरा सामना जिंकणे देखील भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. कारण त्याचा ड्रॉ भविष्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये भारतीय संघासाठी हानिकारक ठरू शकतो.
हेही वाचा-
24.75 कोटींचा ताप उतरला, पंजाबच्या फलंदाजाने स्टार्कला धो धो धुतले, कांगारू गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम
IND vs BAN; दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का? काय आहे हवामान अंदाज
पाच वनडेत केवळ 4 विकेट्स घेणारा गोलंदाज आयपीएल लिलावात ठरणार महागडा? कारण आहे खास