भारतीय संघाची कामगिरी सातत्याने सुधारली आहे. परंतु अलीकडच्या काळात टी20 मध्ये लक्ष्याचा बचाव करण्यास भारतीय संघ अपयशी ठरला आहे. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करायला का आवडत नाही, याचे कारण रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसर्या आणि निर्णायक टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधी सलामीवीर रोहित शर्मा म्हणाला, जर तुम्ही धावांचा पाठलाग करत असाल तर तुम्हाला काय करावे लागेल हे तुम्हाला चांगलेच माहिती असते.
‘200 किंवा 150 असो, आपल्याला लक्ष्य माहित असते आणि कोणत्या वेगाने फलंदाजी करायची हे ही आपल्याला माहित असते.’
प्रथम फलंदाजी करण्याबद्दल रोहित म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा मनात बऱ्याच गोष्टी चालू असतात. जेव्हा आपण एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरतो तेव्हा ती एक वेगळ्या प्रकारची मानसिकता असते. जर आपण चांगले खेळत असेल तर तीच लय कायम ठेवून आपण जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार करतो.’
तसेच रोहित म्हणाला, ‘त्याचवेळी आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही चांगली फलंदाजी करत आहात तरी तुम्ही घाईत तुमची विकेट गमावून चालणार नाही.’
रोहित म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करत असता तेव्हा तुमच्यासमोर तुमचे लक्ष्य असते. तुम्हाला फलंदाजी कशी करावी लागेल हे माहित असते. भागीदारी आणि इतर सर्व काही, आपल्याला माहिती असते.’
बेंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 134 धावांचा बचाव करताना, दिल्लीमध्ये बांगलादेश विरूद्ध 188 धावांचा बचाव करताना आणि तिरुअनंतपुरममध्ये विंडिज विरुद्ध 170 धावांचा बचाव करताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.






