कोरोना व्हायरसमुळे भारताबरोबरच इतर देशांमध्येही लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे.
यामध्ये भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांनी इंस्टाग्रामद्वारे एकमेकांबरोबरच चाहत्यांशीही संवाद साधला. या दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या भविष्याबाबत चर्चा करण्यात आली.
हरभजनने चाहत्यांचा प्रश्न मांडत रोहितला म्हटले की, चाहते धोनीच्या भविष्यावर प्रश्न विचारत आहेत. यावर प्रत्युत्तर देत रोहित म्हणाला की, “धोनी जेव्हा क्रिकेट खेळत नसतो, तेव्हा तो कोणालाही भेटत नाही. तो अंडरग्राऊंड होतो. मी तुम्हा सर्वांना सांगेल की, चाहत्यांनी स्वत: रांचीला जावे आणि धोनीला विचारावे. कारण त्याच्या भविष्याबाबत तो स्वत:च सांगू शकतो.”
“सध्या लॉकडाऊन चालू आहे. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर चाहत्यांना आपापली गाडी घ्यावी आणि रांचीला जाऊन धोनीला विचारावे की, तो भविष्याबाबत काय निर्णय घेणार आहे,” असेही रोहित पुढे म्हणाला.
रोहतबरोबरच हरभजननेही यावेळी आपले मत मांडले. त्याच्या या वक्तव्यावर हरभजन (Harbhajan Singh) म्हणाला की, “मी जेव्हा चेन्नईला गेलो होतो, तेव्हा मला अनेक लोकांनी विचारले होते की, धोनी पुढे काय करणार आहे? मला असे वाटते की, धोनी आयपीएल (IPL) खेळेल. परंतु भारतीय संघाकडून खेळणार नाही. त्याने स्वत:च्या मनात असा निश्चय केला आहे आहे की, तो आता भारताच्या जर्सीत दिसणार नाही.”
“मला नाही वाटत की धोनीला (MS Dhoni) भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे. विश्वचषकापूर्वी मला असे वाटते की, धोनीने निर्णय घेतला होता की, मागील वर्षी विश्वचषकातील उपांत्य सामना किंवा अंतिम सामना हाच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल,” असेही हरभजन पुढे म्हणाला.
यावर रोहित पुढे म्हणाला की, “धोनीबद्दल आमच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. आतापर्यंत आम्ही याबाबत काहीही ऐकले नाही.”
धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयसीसी २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात खेळला होता. यानंतर तो जवळपास १० महिने झाले क्रिकेट खेळताना दिसलेला नाही. विश्वचषक झाल्यानंतरपासून धोनीच्या निवृत्तीबाबत (Retirement) चर्चा होत आहे. परंतु धोनीने यावर कोणतेही वक्तव्य किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही.
धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार आहे. तो आयपीएलच्या १३व्या हंगामातून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतु कोविड-१९ या व्हायरसमुळे (Covid-19 Virus) अनिश्चित काळासाठी आयपीएलचा १३वा हंगाम स्थगित करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तीन पिढ्यांना जोडणारा सचिन नावाचा भक्कम पुल
-सचिन तेंडूलकर आणि क्रिकेटवर्तुळात गाजलेले ५ वाद
-६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले व २०११ला ते पुर्ण झाले






