दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात शनिवारी (१ मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेला हा सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासाठी खास ठरला. तो या सामन्यासाठी मैदानात उतरताच त्याच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे, जो आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला जमला नव्हता.
रोहितचा मोठा विक्रम
चेन्नईविरुद्ध शनिवारी झालेला सामना रोहितचा टी२० क्रिकेट कारकिर्दीतील ३५० वा सामना आहे. त्यामुळे ३५० टी२० सामने खेळणारा तो भारताचा पहिलाच तर जगातील १२ वा खेळाडू ठरला आहे. रोहितने आत्तापर्यंत भारतीय संघ, मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, मुंबई, भारत अ या संघांकडून टी२० सामने खेळले आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित पाठोपाठ एमएस धोनी आहे. त्याने ३३८ टी२० सामने खेळले आहेत. तसेच त्यापाठोपाठ सुरेश रैना असून त्याने ३३१ टी२० सामने खेळले आहेत. त्याचबरोबर ३०० किंवा त्यापेक्षा अधिक टी२० सामने खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत दिनेश कार्तिक आणि विराट कोहली देखील आहेत. कार्तिकने ३१७ टी२० सामने खेळले आहेत. तर विराटने ३११ सामने खेळले आहेत.
सध्या सर्वाधिक टी२० सामने खेळण्याचा विश्वविक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने ५४१ टी२० सामने खेळले आहेत.
रोहितची टी२० कारकिर्द
रोहितने चेन्नईविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी ३४९ टी२० सामन्यांत ३२.११ च्या सरासरीने ९२८० धावा केल्या होत्या. यात त्याने ६ शतके आणि ६५ अर्धशतके केली होती. तसेच ८११ चौकार आणि ३९६ षटकार मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
काहीदिवसांपूर्वी केलेले ‘ते’ ट्विट डिलिट करण्याचा ट्विटरकर्त्यांचा हरप्रीत ब्रारला सल्ला