भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आयपीएल 2022 नंतर चांगलाच चर्चेत आहे. अर्शदीपने आयपीएल प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात स्थान पक्के केले आणि आता तो टी-20 विश्वचषक देखील खेळणार आहे. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. आता यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचेदेखील नाव नोंद झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिका आधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने अर्शदीपवर कौतुकाचा वर्षाव केला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणारा पहिला टी20 सामना मोहाली येथे 20 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. विश्वचषकापूर्वी या मालिकेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मालिकेआधीच्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्याने त्याचे कौतुक केले. रोहित म्हणाला,
“भारतीय संघ मागील काही काळापासून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाच्या शोधात होता. अर्शदीपने आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध केले आणि ही पोकळी भरून काढली. आशिया चषकात पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने अगदी जवळचे होते. त्याने उत्कृष्ट खेळ दाखवला. कधीकधी चांगल्या खेळासोबत नशीबही खूप महत्त्वाचे असते. नाणेफेक जिंकणे, सामन्यादरम्यान धावबाद होणे, काही उत्तम झेल पकडणे या गोष्टी घडत असतात. आपला संघ प्रत्येकच स्पर्धा जिंकत नाही. कधीकधी विरोधी संघालाही श्रेय द्यावे लागते.”
भारताचा 23 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने 7 जुलै 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून यामध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपमुळे भारताला शेवटच्या षटकांमध्ये किफायतशीर गोलंदाजी करणारा खेळाडू मिळाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिकेचा सामना धोक्यात! केरळच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमची लाईटच केली कट
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी






