भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) मोहाली येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) पार पडला. भारतीय संघाने १ डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने या सामन्यात विजय संपादन केला. अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्याचा नायक ठरला. त्यासोबतच अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यानेदेखील लक्षवेधी कामगिरी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर अश्विनचे खास कौतुक केले.
अश्विनची विक्रमी कामगिरी
प्रमुख फिरकीपटू म्हणून संघात असलेल्या अश्विनने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शानदार अर्धशतक ठोकले. त्यानंतर गोलंदाजीला येत दोन्ही डावांमध्ये मिळून ६ बळी आपल्या नावे केले. या दरम्यान त्यांनी भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा ४३४ कसोटी बळींचा विक्रम मागे टाकला. आता अश्विन अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.
रोहितने केले कौतुक
सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने अश्विनचे खास कौतुक केले. तो म्हणाला,
“अश्विन माझ्यासाठी आता सर्वकालीन महान खेळाडू बनला आहे. आपण त्याला अनेक दिवसांपासून खेळताना पाहत आहोत. तो दिवसेंदिवस सर्वोत्तम बनतोय. त्याने एकट्याच्या जीवावर संघाला अनेक सामने जिंकून दिलेत. त्याला स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. हीच त्याच्यासाठी जमेची बाजू ठरते.”
भारतीय संघाने मिळवला शानदार विजय
दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या तीन दिवसात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात रवींद्र जडेजाचे शतक व हनुमा विहारी, रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ४७४ धावांवर आपला डाव घोषित केला होता. त्यानंतर अवघ्या दीड दिवसात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला दोनदा बाद करत एक डाव व २२२ धावांनी विजय संपादन केला. मालिकेतील दुसरा अखेरचा सामना बेंगलोर येथे दिवस-रात्र स्वरूपाचा खेळविण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२मधून धोनीचा पत्ता होणार कट? ‘हा’ खेळाडू सांभाळू शकतो चेन्नईची धुरा (mahasports.in)