आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार उद्यापासून (९ एप्रिल ) रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. मुंबई इंडियन्स संघ देखील मैदानावर घाम गाळताना दिसून येत आहे. अशातच यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघातून मुंबई इंडियन्स संघात सामील झालेल्या खेळाडूबद्दल रोहित शर्माने भाष्य केले आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे, ज्या संघाने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. अशातच आगामी हंगामात देखील मुंबई इंडियन्स आपले ६ वे जेतेपद पटवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स संघात अनुभवी गोलंदाज पियूष चावलाची भर पडली आहे.
पियूषला मुंबई इंडियन्स संघाने फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात २.४ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले आहे. गतवर्षी पियूष चावला चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळला होता. परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याने आयपीएल २०२० हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्याला ६ गडी बाद करण्यात यश आले होते. त्यानंतर चेन्नई संघाने त्याला लिलावाआधी संघातून मुक्त केले होते. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या पियूष चावलाबद्दल रोहित शर्माला विश्वास आहे की, तो मुंबई इंडियन्स संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पियूष चावलाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून झहीर खानने त्याच्याबद्दल केलेले भाष्य लिहिले होते की,” पीयूष चावलाचा अफाट अनुभव संघातील युवा फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरेल- झहीर खान.”
तसेच रोहित शर्माने पियूष चावलाबद्दल बोलताना म्हटले आहे की, “मी १९ वर्षांखालील क्रिकेटपासूनच पियूष सोबत खेळलो आहे आणि मला हे महित आहे की तो एक आक्रमक गोलंदाज आहे. असाच एक फिरकी गोलंदाज आम्हाला हवा होता. पियूष आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने भरपूर सामने खेळले आहेत. तो या खेळाला आणि विरोधी खेळाडूंना चांगलेच ओळखतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात हैं! दिनेश कार्तिकचा दिसला आक्रमक अंदाज, चौकार-षटकारांची केली बरसात, पाहा व्हिडिओ