विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने शानदार कामगिरी करत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
या सामन्यात रोहितने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात 127 धावांची शतकी खेळी केली. तर शमीने दुसऱ्या डावात 35 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. या सामन्यातील शानदार कामगिरीमुळे रोहितला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
विशेष म्हणजे रोहितचा हा कसोटी सलामीवीर म्हणून पहिलाच सामना होता. त्यामुळे शमी आणि रोहितच्या बाबतीत आज एक खास योगायोग झाला आहे.
रोहितने 2013 ला नोव्हेंबरमध्ये कोलकताला झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 177 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याला त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला होता.
विशेष म्हणजे त्या सामन्यातही भारताकडून दुसऱ्या डावात शमीने 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. या सामन्यात भारताने एक डाव आणि 51 धावांनी विजय मिळवला होता.
यानंतर 6 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिला सामना खेळतानाही रोहितने सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. त्याचबरोबर शमीने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.