देशांतर्गत क्रिकेटची सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी 17 सामने खेळले गेले. पहिल्या दिवशी कर्नाटकविरुद्ध 99 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजीत शानदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात अनुपस्थितीत असलेल्या नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडने दमदार शतक करत आपले पुनरागमन साजरे केले.
कर्नाटक विरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघाचा भाग असलेले ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी यांनी या सामन्यात पुनरागमन केले. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या महाराष्ट्राने सेनादलच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. ऋतुराजने सलामीला येत महाराष्ट्राच्या डावाची सूत्रे हाती घेत तुफान फटकेबाजी केली. 65 चेंडूंमध्ये त्याने 112 धावा कुटल्या. यामध्ये बारा चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 112 राहिला. त्याच्याच योगदानाच्या जोरावर महाराष्ट्राने धावफलकावर 185 धावा लावल्या.
ऋतुराजने नुकतेच भारतीय संघासाठी वनडे पदार्पण केले होते. मात्र, आपल्या पहिल्या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरलेला. 43 चेंडूवर त्याने केवळ 19 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात संधी दिली गेली नाही. ऋतुराजने यापूर्वी भारतीय संघासाठी 9 टी20 सामने खेळले आहेत.
फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतरही गोलंदाज मात्र या धावसंख्येचा बचाव करू शकले नाहीत. राहुल सिंगने 38 चेंडूंवर 59 तर अमित पचाराने 31 चेंडूंवर नाबाद अर्धशतक ठोकत संघाला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे मागील वर्षी उपविजेते असलेल्या महाराष्ट्राला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
दिवसातील इतर सामन्यांमध्ये राजस्थान, सौराष्ट्र व तमिळनाडू यांनी देखील विजय संपादन केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंड्याला टक्कर द्यायला आला ‘हा’ ऑलराऊंडर! टी20 सामन्यात तुफानी फिफ्टी आणि घेतल्या 6 विकेट्स
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ