भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने देशभरात खेळले जात आहेत. मंगळवारी (18 ऑक्टोबर) स्पर्धेतील पाचव्या फेरीचे सामने खेळले गेले. महाराष्ट्र विरुद्ध केरळ अशा झालेल्या एका सामन्यात महाराष्ट्राने 40 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखले. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झळकावलेले शतक महाराष्ट्राच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
Maharashtra Won by 40 Run(s) #KERvMAH #SyedMushtaqAliT20 Scorecard:https://t.co/TKPPOfXksr
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 18, 2022
चंदीगड येथील यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेलेल्या एलिट सी गटाच्या सामन्यात केरळ व महाराष्ट्र आमने-सामने आले. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने स्वतः निर्णय सार्थ ठरवत संघाला पवन शहासह 84 धावांची सलामी दिली. पवनने 31 धावांची खेळी केली. अनुभवी राहुल त्रिपाठी खातेही खोलू शकला नाही. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या ऋतुराजने त्यानंतर आक्रमक धोरण स्वीकारले.
केवळ सहा दिवसांपूर्वीच 12 ऑक्टोबर रोजी सर्विसेस विरुद्ध शानदार शतक ठोकणाऱ्या ऋतुराजने या सामन्यातही शतकी खेळी केली. त्याने 68 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 114 धावांची खेळी केली. त्याच्या शतकामुळे महाराष्ट्राने 20 षटकात 4 बाद 167 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना केरळच्या फलंदाजांना विशेष लय सापडली नाही. सलामीवीर रोहन कन्नुमल याने संघासाठी अर्धशतक झळकावले. मात्र, इतर फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत. कर्णधार संजू सॅमसन केवळ तीन धावा करू शकला. केरळ संघ केवळ 127 धावा करू शकला. महाराष्ट्रासाठी अनुभवी सत्यजित बच्छावने सर्वाधिक तीन बळी मिळवले. कर्नाटक आणि सर्विसेसविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर जम्मू कश्मीर, मेघालय व आता केरळविरुद्ध महाराष्ट्राने विजय मिळवले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल टेनिस स्पर्धेत भक्ती ताजने, स्वानिका रॉय, श्रावणी देशमुख यांची आगेकूच
मुलाच्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा बीसीसीआयचे नवे अध्यक्ष मिटींगमधून गेले होते बाहेर