नववर्षात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनीच्या मैदानावर झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. ७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काट्यांची टक्कर पाहायला मिळाली. चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४०७ धावांची आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले होता. मात्र रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने पाचव्या दिवशी शतकी भागिदारी साकारत सामन्याचा कायापालट केला. त्यामुळे चोहोबाजूंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यानेही दोघांची पाठ थोपटली आहे.
पंत आणि पुजाराच्या शानदार भागिदारीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने ट्विट करत त्यांची प्रशंसा केली. पंत आणि पुजाराचा फोटो शेअर करत सचिनने लिहिले की, “आपल्या हाताच्या पाच बोटांमधील प्रत्येक बोट वेगवेगळे काम करत असते. अगदी याचप्रमाणे रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघासाठी योगदान दिले आहे.”
सोबतच सचिनने #ONETEAMONECAUSE असा हॅशटॅग दिला आहे. अर्थातच सचिनला असे म्हणायचे आहे की, एका संघाने सोबत मिळून काम केले तर त्याचा एक चांगला परिणाम शेवटी मिळतो.
On our hand each finger does a different job, and that’s exactly what @cheteshwar1 and @RishabhPant17 did for #TeamIndia. Wonderful partnership.#ONETEAMONECAUSE#AUSvIND pic.twitter.com/sUEwWXXvYj
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 11, 2021
पंत-पुजाराच्या शतकी भागिदारीने भारतीय संघाचे पुनरागमन
भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर २ बाद ९८ धावांपासून पुढे पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने पाचव्या दिवसाचा खेळ सुरु केला होता. परंतु सुरुवातीच्या काही षटकातच रहाणेच्या रुपात भारताला मोठा झटका बसला. पुढे यष्टीरक्षक फलंदाज पंत दुखापतीनंतर जिद्दीने मैदानावर उतरला.
पंतने आक्रमक रवैय्या वापरत पहिल्या षटकापासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. पुजारानेही विकेट वाचवून पंतला साथ दिली आणि पाहता पाहता लंच ब्रेकपर्यंत दोघांनी शतकी भागिदारी रचली. यात पुजाराच्या ४० धावा आणि पंतच्या ७३ धावांचा समावेश होता. पुढे ७९.१ षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने पॅट कमिन्सच्या हातून पंतला ९७ धावांवर झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली. पण तोवर भारताने २५० धावा फलकावर नोंदवल्या होत्या.
त्यांच्यानंतर कसोटीपटू हनुमा विहारी (२३ धावा) आणि फिरकीपटू आर अश्विन (३९ धावा) यांनी नाबाद फलंदाजी करत सामन्याखेर चिवट झुंज दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला चौथ्या डावात २०० धावाही करता येणार नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ दिग्गजाला सणसणीत चपराक
सांघिक कामगिरीचा दाखला; सैनीने जडेजासाठी काढली केळीची साल, एकदा व्हिडिओ पाहाच