टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू वकार युनूसने वादग्रस्त विधान केले होते. चौफेर टीका झाल्यानंतर वकार युनूसला भारतीयांची माफी देखील मागावी लागली. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बटने देखील त्याला चांगलेच सुनावले आहे.
सलमान बट याने वकार युनूसच्या जातीयवादी वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहावे लागेल, असे सलमान बट म्हणाला आहे. भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्यामुळे लोक एकमेकांच्या जवळ येत आहेत.
पाकिस्तान संघाने भारतावर १० विकेटने विजय मिळविल्यानंतर वकार युनूसने विधान केले होते की सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित हिंदूंसमोर मोहम्मद रिझवानने नमाज अदा करणे हा त्याच्यासाठी खूप खास क्षण होता. हे प्रकरण वाढल्यानंतर वकार युनूसनेही आपल्या वक्तव्यावर माफी देखील मागितली आहे.
सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, ‘तुम्ही कोणत्या देशाचे आहात याने काही फरक पडत नाही. तुमची परंपरा कोणतीही असो, सर्व श्रद्धा, धर्म आणि संस्कृती यांचा आदर केला पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावतील, वाईट वाटेल असे कधीही बोलू नये. भारताचा खेळाडू असो की पाकिस्तानचा, आजचा खेळाडू असो किंवा माजी खेळाडू, आपण आशा निरर्थक गोष्टी बोलणे टाळले पाहिजे. क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे सुपरस्टार बनले आहेत. आपण संतुलित मानसिकता ठेवणे फार महत्वाचे आहे. तुमच्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा नाही. जे घडले हे खूप दुःखद आहे.’
सलमान बट पुढे म्हणाला, ‘आपण असे काम केले पाहिजे जे लोकांना जोडेल. फूट पाडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. सामन्यादरम्यान अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. दोन्ही बाजूंच्या लोकांनी चांगल्या क्रिकेटचे कौतुक केले आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीशी संवाद साधला. आपण चांगल्या गोष्टींवर प्रकाश टाकला पाहिजे आणि वाईट गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत.’
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजन सिंग म्हणतो, न्यूझीलंडविरुद्ध भारताने ‘या’ खेळाडूला द्यावे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान





